भारतात 24 तासांत तब्बल 2,59,170 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
मुंबई– कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात थैमान घातले आहे. महाराष्ट्र, छत्तीसगढ, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्लीपाठोपाठ देशातील इतर राज्यांतही कोरोनाने हातपाय पसरले असून दररोज धडकी भरवणारी आकडेवारी समोर येऊ लागली आहे. देशात आज पुन्हा एकदा विक्रमी रुग्णवाढ नोंदवली गेली असून मृत्यूचा आकडाही हजारांच्या पुढे आहे. देशात मागील 24 तासांत तब्बल 2,59,170 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 1,761 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 1,53,21,089 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 1,80,530 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात 1,54,761 जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत 1,31,08,582 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या 20,31,977 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.
गेल्या वर्षी १७ सप्टेंबरला देशात ९७ हजार ८९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. कोरोना काळातील ती सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ होती. त्यानंतर यावर्षी ५ एप्रिलला पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णवाढीने एक लाखांचा टप्पा पार केला होता. दरम्यान, २०२० साली भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. परंतु त्यानंतर काही महिन्यांनी अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अनलॉक काळात रुग्णसंख्येने मोठी उसळी घेतली. सध्या भारतात कोरोना लसीकरण सुरू आहे, मात्र देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या कोटीच्या संख्येत गेल्याने चिंता वाढली आहे. तसेच दररोज आढळणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे.