भारत-कॅनडातील तणाव वाढला; कॅनडातील भारतीयांना काळजी घेण्याचं आवाहन
![India-Canada tensions rise; An appeal to Indians in Canada to take care](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/Indians-Canada--780x470.jpg)
Indians-Canada : भारत व कॅनडातील वाद हळूहळू वाढू लागला आहे. हरदीपसिंग निज्जर याच्या हत्याप्रकरणावरून दोन्ही देश एकमेकांवर आरोप करत असून आपापल्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करत आहेत. आधी कॅनडानं आपल्या नागरिकांना जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता काळजी घेण्याचं आवाहन केलं असताना आता भारतानं कॅनडात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी कॅनडात राहणाऱ्या भारतीयांसाठी सूचनापत्र जारी केलं आहे. कॅनडातील भारतीय नागरिक व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना, असं या पत्रकाच्या सुरुवातीलाच नमूद केलं आहे.
कॅनडातील भारतीयांसाठी काय आहेत सूचना?
कॅनडामधील भारतविरोधोी कारवाया, राजकीय पुरस्कृत द्वेष-गुन्हे आणि हिंसाचार पाहाता तिथे राहणारे भारतीय नागरिक व तिथे जाऊ इच्छिणारे भारतीय यांनी अतिशय काळजी घेणं आवश्यक आहे. कॅनडातील भारतविरोधी अजेंड्याला विरोध करणाऱ्या भारतीयांना व भारतीय अधिकाऱ्यांना धोका पोहोचवण्याचे प्रयत्न झाले.
हेही वाचा – इन्श्युरन्स कंपनीने तुमचा क्लेम रिजेक्ट केला तर या पद्धतीने तुम्ही करू शकता तक्रार?
Advisory for Indian Nationals and Indian Students in Canada:https://t.co/zboZDH83iw pic.twitter.com/7YjzKbZBIK
— Arindam Bagchi (@MEAIndia) September 20, 2023
या सर्व घटनांमुळे अशा धोकादायक ठिकाणी किंवा तशा घटना ठरण्याची शक्यता असणाऱ्या ठिकाणी प्रवास करणं भारतीय नागरिकांनी टाळावं. तिथल्या भारतीयांच्या सुरक्षेची हमी निश्चित करण्यासाठी आपले उच्चायुक्त कॅनडा सरकारच्या संपर्कात कायम राहतील. कॅनडातील परिस्थिती पाहाता विशेषत: भारतीय विद्यार्थ्यांनी अतिशय काळजी घेण्याची व कायम सतर्क राहण्याची गरज आहे.
कॅनडात राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी ओट्टावामधील भारतीय उच्चायुक्त किंवा टोरंटो व व्हँकोव्हरमधील भारतीय दूतावासाच्या वेबसाईटवर आपली नोंदणी करणं आवश्यक आहे. याशिवाय, madad.gov.in या वेबसाईटवरही तुम्ही नोंदणी करू शकता. अशी नोंदणी केल्यास संकटाच्या प्रसंगी भारतीय उच्चायुक्तांना व दूतावासाला भारतीय नागरिकांपर्यंत पोहोचणं सोपं होईल, असं या परिपत्रकात म्हटलं आहे.