मार्च महिन्यात शनिवारीही सुरू राहणार प्राप्तिकर कार्यालये
![Income tax offices will also be open on Saturdays in March](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/income-tax-department.jpg)
नवी दिल्ली | करदात्यांच्या तक्रारींचे समाधान करण्यासाठी प्राप्तिकर खात्याची कार्यालये मार्च महिन्यात दर शनिवारी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर दात्यांच्या अनेक तक्रारी असतात. त्यांच्या तक्रारींची वेळेत दखल घेतली जात नाही. त्यामुळे करदात्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
मुख्य प्राप्तिकर आयुक्तांसह त्यांच्या समकक्ष सर्व कार्यालये या महिन्यातील दर शनिवारी सुरू राहणार आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला दिली. आज, १२ मार्चपासून याची सुरुवात झाली आहे. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी करदात्यांच्या समस्या आणि तक्रारी दूर करता याव्यात याकरता शनिवारी कार्यालये सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे या मार्च महिन्यात 3 अतिरिक्त दिवस कर्मचा-यांना काम करावे लागणार आहे. यामुळे करदात्यांच्या तक्रारींचा लवकर निपटारा होईल अशी आशा आहे.
दरम्यान, सीबीडीटी आणि सीबीआयसी यांच्या बंगळुरु येथील एका कार्यक्रमात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अधिकऱ्यांचे कान टोचले. करदात्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिकारी सक्रियपणे सहभाग घेत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ हे प्राप्तीकर खात्याचे अग्रगण्य धोरण निर्मिती करणारे मंडळ आहे. तर केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ हे सीमा शुल्क केंद्रीय उत्पन्न शुल्क अथवा वस्तू आणि सेवा कर विभागासाठीचे एक महत्वपूर्ण प्राधिकरण आहे.
२०२१-२२ या आर्थिक वर्षात २.१४ कोटी करदात्यांना १.८६ लाख कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. प्राप्तिकर विभागाने याबाबत ट्विट केलं आहे. प्रत्यक्ष कर मंडळाने 1 एप्रिल 2021 ते 7 मार्च 2022 या दरम्यान 2.14 कोटींहून अधिक करदात्यांना 1,86,677 कोटी रुपये परत केल्याची माहिती ट्विटमध्ये देण्यात आली आहे. 2,11,76,025 प्रकरणात 67,442 कोटी रुपयांचा प्राप्तिकर परतावा देण्यात आला तर 2,31,654 प्रकरणात कॉर्पोरेट कर परतावा देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.