जाणून घ्या कुठवर पोहोचला ‘तौक्ते’चा तडाखा
गांधीनगर – अरबी समुद्रातील महाभयंकर ‘तौक्ते’ चक्रीवादळाने रौद्ररूप धारण करत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रात धुमाकूळ घातल्यानंतर सोमवारी (17 मे) रोजी रात्रीच्या सुमारास ते गुजरातच्या समुद्रकिनारी धडकले. यादरम्यान चक्रीवादळाचा वेग ताशी 185 किलोमीटर इतका नोंदवला गेला. गुजरात किनाऱ्यावर दीव ते महुवादरम्यान तोक्ते चक्रीवादळाचा लँडफॉल सुरू झाला, ज्यानंतर 12 तासांच्या कालावधीत चक्रीवादळाची तीव्रता टप्प्याटप्प्याने कमी होणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तौक्ते चक्रीवादळ जमिनीला धडकले ती संपूर्ण प्रक्रिया सुमारे दोन तास सुरू होती. चक्रीवादळाचे केंद्र जसजसे जवळ आले तसतसे गुजरातमध्ये मोठे नुकसान झाले. चक्रीवादळामुळे येथील अनेक भागांत सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सध्या कोकण आणि मुंबईच्या किनाऱ्यांपासून हे वादळ बरेच पुढे गेले असले तरी वादळाचे परिणाम मात्र अद्यापही कायम असल्याचे दिसून येत आहे. कोकणातील बहुतांश भाग अद्यापही ढगाळलेला असून काही भागांत पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत. मुंबई व परिसर, रायगड, ठाणे, पालघर या भागांमध्ये सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या सरी सुरूच आहेत. त्यामुळे तौक्ते सरले असले तरीही त्याचे परिणाम मात्र अद्यापही दिसत आहेत. भयंकर म्हणजे चक्रीवादळामुळे राज्यात नऊ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे आठ हजार घरांचे नुकसान झाले.
दरम्यान, चक्रीवादळाच्या संकटाची तीव्रता पाहता सुरक्षेचे उपाय म्हणून गुजरातमध्ये जवळपास दीड लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. याशिवाय एनडीआरएफ आणि एसडीआरएफची तब्बल 54 पथके याठिकाणी मदत आणि बचावकार्यासाठी तैनात करण्यात आली आहेत.