भोंग्याच्या मुद्द्यावर मनसेला भाजपचा पाठिंबा आहे का?; गिरीश महाजन म्हणाले…
जळगाव: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा हाती घेत राजकीय वर्तुळाचे लक्ष आपल्याकडे वळवले आहे. या प्रखर भूमिकेनंतर राज ठाकरे यांचा ‘हिंदू जननायक’ असा उल्लेखही त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होऊ लागला आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीकास्त्र सोडले आहे. मनसेला भाजचा छुपा पाठिंबा आहे, असा आरोपही आघाडीचे नेते करत आहेत. यावर भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपचा मनसेला पाठिंबा आहे असे नाही. मात्र भोग्यांबाबतच्या भूमिकेबाबत आमचे दुमत नाही. भोंग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे, असे आमचे मत आहे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. (issue of horns on mosques raised by mns chief raj thackeray)
औरंगाबाद येथे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा झाली. ही सभा होण्यापूर्वी महाजन यांनी आपले मत व्यक्त केले. मनसेला भाजपचा पाठिंबा आहे का?, असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी महाजन यांना विचारला. त्यावर बोलताना महाजन म्हणाले की, भाजपचा मनसेला पाठिंबा आहे असे नाही. त्यांचा पक्ष वेगळा आहे त्यांचा अजेंडा वेगळा आहे. त्यांची ध्येयधोरणे व विचार सुद्धा वेगळे आहेत. भोंग्याबाबत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणीही झाली पाहिजे. मात्र यावर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असा धर्म भेद न करता कामा नये. किंवा त्यावर राजकारण करता कामा नये. तो निर्णय सर्वांसाठी असला पाहिजे. सुप्रीम कोर्टाने जर निर्णय दिला आहे तर त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
गिरीश महाजन यांनी भोंग्याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत एकप्रकारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पाठराखण केली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.