#CoronaVirus | 24 तासांमध्ये 51 मृत्यू, आत्तापर्यंतची सर्वाधिक संख्या
नवी दिल्ली | देशभर कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. गेल्या 24 तासांमध्ये 51 जणांचा मृत्यू झाला. ही आत्तापर्यंतची सर्वात जास्त संख्या आहे. तर कोरोना रुग्णांची सख्या 9352 वर पोहोचली आहे तर मृत्यूची संख्या 324 वर गेली आहे. 8048 रुग्ण उपचार घेत असून 979 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यात 72 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. मात्र देशात कोरोनाच्या उद्रेकाची सर्वोच्च स्थिती अजूनही आलेली नाही अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली.
आत्तापर्यंत 2,06,212 कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यात 857 नवे रुग्ण सापडले. मात्र अशाही परिस्थितीत काही सकारात्मक घटना घडत आहेत. देशातल्या 25 राज्यांमधल्या काही जिल्ह्यांना कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश मिळालं असून त्यात महाराष्ट्रातल्या गोंदिया या जिल्ह्याचा समावेश आहे. केंद्रीय पातळीवर याची दखल घेण्यात आली आहे. या जिल्ह्यांमध्ये पूर्वी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. मात्र जिल्हा प्रशासनाने जे उपाय केले त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखला गेला. चीनमधून ज्या कोरोना किट मागविण्यात आल्या होत्या त्या दोन दिवसांमध्ये भारतात येतील अशी माहिती ICMRचे शास्त्रज्ञ रमण गंगाखेडकर यांनी दिली.