#CoronaVirus: १ जून पासून रोज २०० विशेष ट्रेन्स धावणार, रेल्वे मंत्र्यांची घोषणा
देशभरात अडकून पडलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी श्रमिक स्पेशल आणि श्रीमंतासाठी राजधानी स्पेशल सुरु केल्यानंतर आता रेल्वे देशभरात मेल एक्स्प्रेस सुर करणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे. १ जूनपासून २०० स्पेशल रेल्वे गाड्या वेळापत्रकानुसार सोडल्या जातील असं पियूष गोयल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्रेन्ससाठीचे ऑनलाइन बुकिंगही लवकरच सुरु होईल असंही गोयल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये स्पष्ट केलं आहे.
Indian Railways to run 200 non-AC trains from 1st June everyday as per the time table; online booking for these to begin soon: Railways Minister Piyush Goyal pic.twitter.com/FyuDQYCfq8
— ANI (@ANI) May 19, 2020
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. अशात सर्वाधिक हाल सहन करावे लागत आहेत ते स्थलांतरित मजुरांना. या मजुरांसाठी श्रमिक स्पेशल ट्रेन्स याआधीही सोडण्यात आल्या. आता १ जून पासून दररोज २०० ट्रेन्स वेळापत्रकाप्रमाणे धावतील असं केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्य सरकारांनाही पियूष गोयल यांनी एक आवाहन केलं आहे की त्यांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित मजुरांना सहकार्य करावं. त्यांच्या जवळ असलेल्या मेनलाइन स्टेशनजवळ नोंदणी सुरु करावी. त्याची यादी रेल्वे अधिकाऱ्यांकडे द्यावी. जेणेकरुन त्यानुसार रेल्वे श्रमिक स्पेशल ट्रेन चालवू शकेल. तसंच जे स्थलांतरित मजूर आहेत त्यांना आपल्या घरी लवकरच जाता येईल. त्यांनी काळजी करु नये असंही पियूष गोयल यांनी स्पष्ट केलं आहे.