#Coronavirus : वांद्रे प्रकरणाची सखोल चौकशी करा, राष्ट्रवादीचे अमित बच्छाव यांची मागणी
पिंपरी| महाईन्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन जनसामान्यांसाठी दिवसरात्र काम करत आहे, लोकांना ते दिसत आहे. बहुसंख्य जनता महाविकास आघाडीच्या सरकारवर आणि त्यांच्या एकूणच कामावर समाधानी आहे. परंतू काही जण सरकारला अडचणीत आणण्याचे प्रयत्न करीत आहेत. मुंबईतील वांद्रे गर्दी प्रकरण ही त्याचाच भाग आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिं.चीं.शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी केली आहे.
बच्छाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाविकास आघाडीने नेहमीच महाराष्ट्र विकासाला प्रथम प्राधान्य दिले आहे. सत्तास्थापन होऊन काही महिने उलटले.कोरोना सारख्या आजाराने देशासह महाराष्ट्रात थैमान घातले.परंतू महाविकास आघाडी सरकार संपुर्ण परिस्थिती नियंत्रणात ठेवून जनतेच्या विश्वासास पात्र ठरत आहे. त्यामुळे सरकारला बदनाम करण्यासाठी अनेक षडयंत्र रचले जात आहेत.
मुंबईतील वांद्रे स्टेशनबाहेर जमवला गेलेला जमाव हा ही एक सुनियोजीत कटाचाच भाग असल्याच शक्यता अधिक वाटतेय. वांद्रे स्टेशन हे काही लांब पल्ल्याच्या रेलगाड्या सुटण्याचे स्थान नाही. जर स्वयंस्फुर्तीने जमाव जमलाच असता तर सीएसटी, दादर किंवा लो.टिळक टर्मिनल्सला जमायला हवा होता. परंतु, तो वांद्रे इथेच का जमवला गेला? याचे उत्तर शोधायला हवे. हा जमाव जमवण्यामागे कुणाचे अदृश्य हात आहेत याचेही उत्तर मिळायलाच हवे.
सरकारच्या प्रयत्नांना डाग लागेल असा हेतू बाळगून जनतेमधे अफवा पसरवणारे कोण आहेत? याचा छडा लावायलाच हवा. तसेच क्षणिक राजकिय फायद्यासाठी महाराष्ट्राशी गद्दारी करणार्यांचा बुरखा टराटरा फाडायची वेळ आज येवून ठेपलीय.त्यामुळे या प्रकरणाचा करता-करविता कोण आहे.याची सखोल चौकशी करून सत्य जनते समोर आणले गेले पाहिजे, असे अमित बच्छाव यांनी म्हटले आहे.