#CoronaVirus: देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ,पण ही वाढ राष्ट्रीय ट्रेंड नाही
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Untitled-6.png)
देशात कोरोना विषाणू संक्रमित रुग्णांच्या संख्येत गेल्या काही तासांमध्ये झालेली वाढ हा राष्ट्रीय ट्रेंड नाही. दिल्लीतील निजामुद्दीन भागातील तबलिगी समाजाच्या कार्यक्रमात या विषाणूचा मोठा संसर्ग झाला. अनेक जण या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या संसर्गामुळे आकडेवारीत वाढ झाली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव आगरवाल यांनी म्हटले आहे. बुधवारी दैनंदिन पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
तबलिगी समाजाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या १८०० जणांना वेगवेगळी नऊ रुग्णालये आणि विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे, तसेच कालच्या तुलनेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत बुधवारी ३८६ ने वाढ झाली आहे. ही वाढ मोठी दिसत असली तरी त्यामध्ये तबलिगी समाजाच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आणि तिथेच संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.
रेल्वेच्या २० हजार डब्यांची पुनर्रचना करून ३.२ लाख विलगीकरण कक्ष तयार करण्यात येत आहेत. सध्या ५००० डब्यांची पुनर्रचना करण्याचे काम सुरू आहे. अत्यावश्यक सेवेतील विमानांच्या साह्याने कोरोना विषाणू बचावात्मक सामग्री विविध ठिकाणी पाठविण्यात येत आहे. यामध्ये टेस्टिंग किट्स, औषधे, मास्क यांचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.