#CoronaVirus: ‘तबलीग जमात’साठी गेलेले कोल्हापुरातील २१ जण दिल्लीतच
तबलीग जमातीसाठी कोल्हापुरातून गेलेले २१ मुस्लीम बांधव अद्याप दिल्लीतच आहेत. तेथे ते आरोग्यदृष्टय़ा तंदुरुस्त आहेत, तरीही प्रशासन त्यांच्यावर नजर ठेवून असल्याचे बुधवारी येथे सांगण्यात आले.
तबलीग जमातीतून दिल्लीला कोल्हापुरातील २१ लोक गेले होते. ते अजूनही दिल्ली मध्येच आहेत. ते कोल्हापुरात आलेलेच नाहीत. टाळेबंदी मागे घेतल्यानंतरच ते कोल्हापुरात येणार आहेत. यापैकी कोणालाही करोनाची लागण झालेली नाही. त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे स्पष्टीकरण मुस्लीम बोर्डिगचे अध्यक्ष गणी आजरेकर यांनी आज केले आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनीही तबलीग जमातीसाठी गेलेले लोक परत आले नसल्याचे सांगितले. त्यांच्या शहरात येण्याच्या प्रवासावर प्रशासन लक्ष ठेवून आहे. कोल्हापुरात आल्यावर त्यांची काटेकोर आरोग्य तपासणी केली जाणार आहे. तबलीग जमाती वा अन्य कारणासाठी दिल्ली वा अन्य भागात कामासाठी कोणी गेले असेल, त्यांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी. त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.