Corona Update: देशात रुग्णसंख्येत वाढ; चिंता वाढली
नवी दिल्ली- देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ पाहायला मिळाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 46 हजार 164 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या दिवशीच्या तुलनेत ही 22.7 टक्क्यांची वाढ आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत केरळ राज्याने चिंता वाढवली आहे. नव्या कोरोना रुग्णांपैकी 70 टक्के रुग्ण केरळ राज्यातील आहेत. देशात दिवसभरात 34 हजार 159 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. गेल्या 24 तासांत 607 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
चिंतेची बाब म्हणजे देशातील सक्रीय रुग्णांची संख्या पुन्हा 1 टक्क्यांच्या पुढे गेली आहे. सध्या देशात कोरोनाचे 3 लाख 33 हजार 725 रुग्ण आहेत. तसेच, विषाणूवर मात करणाऱ्या रुग्णांचा दर 97.63 टक्के आहे. आतापर्यंत 3 कोटी 17 लाख 88 हजार 440 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. समाधानाची बाब म्हणजे 31 दिवसांपासून संक्रमण दर 3 टक्क्यांपेक्षा कमी आहे. आतापर्यंत देशातील 60.38 कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस मिळाला आहे.
केरळ राज्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारी केरळमध्ये 31 हजार 455 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 215 लोकांचा विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना संक्रमण दर 12 टक्क्यांपेक्षा वरती नोंदला जात आहे. मंगळवारी केरळमध्ये 24 हजार 296 कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. 27 मे 2021 नंतर पहिल्यांदाच केरळनं 24 हजार 000 रुग्णांचा टप्पा पार केला होता. या दिवशी केरळमध्ये 24 हजार 166 रुग्ण आढळून आले होते. तसंच केरळमध्ये 20 मे रोजी 30 हजार पेक्षा अधिक नवे रुग्ण आढळून आले होते.
महाराष्ट्राची कोरोना आकडेवारी
राज्यात दिवसभरात 5 हजार 031 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 64 लाख 37 हजार 680 वर पोहोचली. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या काहीशी वाढून 49 हजार 752 वरून 50 हजार 183 इतकी झाली. तर दिवसभरात 4 हजार 380 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 62 लाख 47 हजार 414 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.04 टक्के एवढं झालं आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली.