कोरोनाचा उद्रेक! भारतात आजही 4 लाखांहून अधिक नवे रुग्ण
![… So the threat of a third wave of corona to the state in a month, the task force expressed fears](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/1800x1200_coronavirus_1-3.jpg)
नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात अक्षरश: कहर माजवला आहे. महाराष्ट्र, छत्तीसगढ, पंजाब, मध्य प्रदेश आणि दिल्लीपाठोपाठ देशातील इतर राज्यांतही कोरोनाने हातपाय पसरले असून दररोज धडकी भरवणारी आकडेवारी समोर येऊ लागली आहे. यंदा २१ एप्रिलला देशात पहिल्यांदाच दिवसभरात तीन लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. भारतात आढळलेली ही जगातील सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ होती. धक्कादायक बाब म्हणजे या दिवसानंतर भारतात दररोज ३ लाखांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद होत होती. त्यातच काल (६ मे) भारतातील दैनंदिन रुग्णवाढीने तब्बल ४ लाखांचा टप्पा ओलांडला.
देशात मागील 24 तासांत तब्बल 4,14,188 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 3,915 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 2,14,91,598 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 2,34,083 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात 3,31,507 जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत 1,76,12,351 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या 36,45,164 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.
गेल्या वर्षी १७ सप्टेंबरला देशात ९७ हजार ८९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. कोरोना काळातील ही सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ होती. त्यानंतर यावर्षी ५ एप्रिलला पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णवाढीने एक लाखांचा टप्पा पार केला होता. तर २२ एप्रिलला दैनंदिन रुग्णवाढीने तब्बल ३ लाखांचा टप्पा ओलांडला आणि काल (६ मे) दैनंदिन रुग्णसंख्या ४ लाखांच्या पुढे गेली. त्यामुळे चिंता प्रचंड वाढली आहे. सध्या भारतात कोरोना लसीकरण सुरू असले, तरी देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या २ कोटींच्या पार गेल्याने सर्वांनी आपली व आपल्या प्रियजनांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.