देशात कोरोनाचा उद्रेक, गेल्या २४ तासांत तब्बल ६२ हजारांहून अधिक रुग्ण, २९१ रुग्णांचा मृत्यू
नवी दिल्ली – देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवसवाढत जाताना दिसतेय. संसर्ग वेगाने पसरत असल्याने नियमित कोरोना रुग्णांमध्ये हजारोंनी वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत देशात ६२ हजार २५८ रुग्णांची वाढ झाली आहे. या वर्षातील ही सर्वाधिक आकडेवारी आहे. तर, गेल्या २४ तासांत ३० हजार ३८६ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. १६ ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच देशात इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले असून यासोबत रुग्णसंख्या १ कोटी १९ लाखांवर पोहोचली आहे. शुक्रवारी देशात ५९ हजार ११८ रुग्ण आढळले होते. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
शुक्रवारच्या तुलनेत देशात शनिवारी रुग्णसंख्या ५.३ टक्क्यांनी वाढली आहे. यासोबत देशात गेल्या २४ तासात २९१ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण रुग्णसंख्या १ लाख ६१ हजार २४० इतकी झाली आहे. याशिवाय ३० हजार ३८६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत १ कोटी १२ लाख ९५ हजार २३ जण करोनामुक्त झाले आहेत.
देशात सध्याच्या घडीला ४ लाख ५२ हजार ६४७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ५ कोटी ८१ लाख ९ हजार ७७३ जणांचं लसीकरण झालं आहे. ३० जानेवारीला भारतात सर्वात पहिला कोरोना रुग्ण सापडला होता. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आणि त्यानंतर ब्राझीलचा क्रमांक आहे. याशिवाय देशात सर्वाधिक करोना फटका बसलेल्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.