कोरोना आपल्या संयमाची परीक्षा घेत आहे – नरेंद्र मोदी
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला असून केंद्र आणि राज्य सरकारे लढाई करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे यावेळी मोदी म्हणाले. तसेच ‘कोरोना संयमाची परीक्षा घेत आहे’, असे सांगत ‘आपले अनेक सहकारी, नातेवाईक आपल्याला सोडून गेले आहेत. हा धैर्य आणि संयमाचा क्षण आहे’, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमातून देशवासियांना धीर देण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या विरोधातील लढाई मजबुतीने सुरू आहे. सर्व सेक्टरच्या लोकांनी सल्ले दिले आहेत. राज्य सरकारही आपल्या पातळीवर काम करत आहे, असे ते म्हणाले. त्याचबरोबर ‘कोरोना काळात केवळ तज्ज्ञांचा सल्ला घ्या. फॅमिली डॉक्टर्स किंवा तुमच्या जवळपासच्या डॉक्टर्सचा सल्ला घ्या. कोरोनाविरुद्धची लढाई लढण्यासाठी तज्ज्ञ आणि संशोधकांच्या सल्ल्यांची गरज आहे. राज्य सरकारांकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जात आहे’, असेही मोदींनी म्हटले. महत्त्वाचे म्हणजे ‘केंद्र सरकारकडून सर्व राज्य सरकारांना विनामूल्य लस पुरवण्यात आली आहे, जिचा लाभ 45 वर्षांवरील सर्व लोक घेऊ शकतात. आता 1 मे पासून देशात 18 वर्षांवरील प्रत्येकाला लस उपलब्ध होणार आहे’, असे मोदींनी सांगितले. ‘केंद्र सरकार सर्व राज्यांना मोफत कोरोना लसी पाठवत आहे. कोणत्याही नागरिकाने कोरोना लसीबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये’, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, यावेळी पंतप्रधानांनी देशातील विविध भागात कार्यरत असलेल्या पहिल्या फळीतील कोविड योद्ध्यांशी चर्चा केली. त्यांनी महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांच्याशीही चर्चा केली. यावेळी पंतप्रधान म्हणाले, ‘आपण सध्या दिवसरात्र काम करत आहात. आपण लोकांना दुसऱ्या लाटेबद्दल सांगावे. करोनाची दुसरी लाट कशी वेगळी आहे आणि काय काळजी घ्यायला हवी?,’ असा प्रश्न मोदींनी केला. त्याला उत्तर देताना शशांक जोशी म्हणाले, ‘दुसरी लाट खूप वेगाने आली आहे. पहिल्या लाटेपेक्षा यावेळी विषाणूच्या प्रसाराचा वेग जास्त आहे. चांगली बाब ही आहे की, रिकव्हरी रेट आहे आणि मृत्यूदर खूप कमी आहे. यावेळी कोरोनाचा संसर्ग तरुणांमध्ये आणि मुलांमध्येही दिसून येत आहे. लक्षणांमध्ये आणखी भर पडली आहे. लोक घाबरलेले आहेत पण घाबरण्याची गरज नाही. ८० टक्के लोकांना लक्षणेच नाहीत. म्युटेशनमुळे घाबरून जाण्याची गरज नाही. विषाणू येत जात राहतो’, असे शशांक जोशी म्हणाले.