देशात कोरोना मृत्यूचं थैमान; 24 तासांत 1,700 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू
![Corona death throes in the country; More than 1,700 patients died in 24 hours](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/corona-death-1.jpg)
नवी दिल्ली | प्रतिनिधी
एकीकडे कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याची चिन्हं दिसत असतानाच वाढत्या मृत्यूने चिंता वाढवली आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी 1,000 पेक्षा रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मंगळवारी (1 फेब्रुवारी) 1,192 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गेल्या 24 तासांत (2 फेब्रुवारी) 1,700 पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा जोर ओसरताना दिसू लागला आहे. दिवसागणिक दररोज आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येत घट होत आहे. ही बाब दिलासादायक असली, तरी दुसरीकडे वाढत्या कोरोना मृत्यूंमुळे चिंता वाढली आहे.
मागील काही दिवसांपासून देशातील कोरोना मृतांचा आलेख दररोज वर जात आहे. गेल्या 24 तासांत देशात 1,733 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सलग पाचव्या दिवशी कोरोना मृतांच्या आकड्यात वाढ झाली आहे.
शनिवारी (29 फेब्रवारी) समोर आलेल्या आकडेवारीनुसार देशात 871 मृत्यू झाले होते. त्यानंतर रविवारी (30 जानेवारी) 893, सोमवारी (31 जानेवारी), मंगळवारी (1 फेब्रुवारी) 1,192 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मात्र, गेल्या 24 तासांत झालेल्या मृतांच्या आकड्यांनी टेन्शन वाढवलं आहे. 1,733 रुग्णांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. देशातील एकूण कोरोना मृतांची संख्या 4 लाख 97, 975 वर म्हणजे पाच लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.
24 तासांत 1.61 लाख रुग्ण
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार देशात गेल्या 24 तासांत 1,61,386 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 1 जानेवारीच्या तुलनेत रुग्णसंख्येत 3.4 टक्के घट झाली आहे. देशात आढळून आलेल्या एकूण रुग्णसंख्येपैकी 65.1 टक्के रुग्ण पाच राज्यांत आढळून आले आहेत. यात महाराष्ट्राचाही समावेश आहे.
सर्वाधिक रुग्ण आढळलेली राज्ये
देशात सर्वाधिक रुग्ण आढळत असलेल्या राज्यांत महाराष्ट्राचाही समावेश आहे. पहिल्या क्रमांकावर केरळ असून, तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा आहे. मागील 24 तासांत केरळमध्ये 51 हजार 887, तामिळनाडूमध्ये 16,096, महाराष्ट्रामध्ये 14,372, कर्नाटकामध्ये 14,366 आणि गुजरातमध्ये 8,338 रुग्ण आढळले आहेत.
मृतांचा आकडा का वाढतोय?
काही दिवसांपूर्वी दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात एक अभ्यास करण्यात आला. या अभ्यासमध्ये असं दिसून आलं आहे की, तिसऱ्या लाटेमध्ये 60 टक्के मृत्य हे लस न घेतलेल्या किंवा एकच डोज घेतलेल्या रुग्णांचे झाले आहेत.मृतांमध्ये लस न घेतलेल्यांबरोबरच ज्यांना इतर गंभीर आजार आहेत अशांचाही समावेश आहे. दिल्ली सरकारने दिलेल्या माहितीप्रमाणे 13 ते 25 जानेवारी दरम्यान ज्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यापैकी 64 टक्के रुग्णांनी कोरोना लसच घेतलेली नव्हती. या कालावधीत दिल्लीत 438 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी 318 जणांना गंभीर आजाराने ग्रासलेलं होतं.