भय्यू महाराज आत्महत्याप्रकरणी सीबीआय चौकशी करा; भक्तांकडून मागणी
इंदूर | टीम ऑनलाइन
अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणाचा निष्पक्ष तपास करावा, अशी मागणी भक्तांकडून करण्यात आली आहे. त्यासाठी भय्यू महाराजांच्या शिष्यांनी सीबीआयला पत्रही लिहिलं आहे. सीबीआयने भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी सीबीआयने बारकाईने तपास केला तर, भय्यू महाराजांनी आत्महत्या नव्हे तर त्यांची हत्या झाली होती हे स्पष्ट होईल, असा विश्वासही त्यांना वाटत आहे. तर दुसरीकडे शिक्षा झालेल्या गुन्हेगारांचे वकील जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत.
भय्यू महाराज यांच्या निधनानंतर उज्जैन येथील त्यांचे शिष्य भारत पोरवाल यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. यासाठी त्यांनी सीबीआयला पत्रही लिहिलं होतं. ते अजूनही आपल्या मागणीवर ठाम आहेत. यावेळी त्यांनी इंदूर जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निकालाचाही सन्मान करत असल्याचं म्हटलं आहे. पण न्यायालयासमोर सर्व पुरावे आणि कागदपत्रे सादर करण्यात आले नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पण या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला तर अनेक बाबी स्पष्ट होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे इंदूर जिल्हा न्यायालयानं सेवादार विनायक केअरटेकर पालक आणि सेवादार शरद यांना 6 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे आरोपीचे वकील उच्च न्यायालयात जाण्याची तयार करत आहेत. जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे.
भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणातील आरोपी सेवादार शरद यांची बाजू मांडणारे वकील धर्मेंद्र गुर्जर यांनी सांगितलं की, महाराजांच्या आत्महत्या प्रकरणात आरोपी करण्यात आलेल्या सेवादारानं देखील सीबीआय चौकशीची मागणी केली होती. पण त्यांच्या मागणीनंतर लगेचच त्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आणि त्यांना आरोपी बनवलं गेलं. आरोपी सेवेदार शरदलाही या प्रकरणी सीबीआय तपास हवा आहे. त्याचबरोबर हे प्रकरण उच्च न्यायालयात नेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.