Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी

‘जातीच्या नावावर विष पसरवण्याचा प्रयत्न’; पंतप्रधान मोदी यांची विरोधकांवर टीका

नवी दिल्ली : काही लोक जातीच्या नावावर समाजात विष पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर केली. तसेच लोकांनी गावगाड्याची संस्कृती आणि वारसा अधिक मजबुतीने जपत अशा प्रकारचे षड्यंत्र हाणून पाडण्याचे आवाहनही या वेळी त्यांनी केले.

ग्रामीण भारत महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी आपले सरकार २०१४ पासून ग्रामीण विकासावर लक्ष केंद्रित करत असल्याचे म्हटले आहे. तसेच २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यात गावे महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर इंडिया आघाडीच्या इतर नेत्यांवर नाव न घेता शाब्दिक हल्ला चढविला. राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते सातत्याने जात जनगणनेची मागणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

काही लोक अनेक दशकांपासून गरिबी हटवण्याचा नारा देत आहेत, पण आता देशात खरोखरच गरिबी कमी होत असल्याचे ते म्हणाले. या वेळी ग्रामीण भागातील गरिबी कमी झाल्याच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अभ्यासाचाही उल्लेख केला.

हेही वाचा –  नियोजन प्राधिकरणांचे काम कंपनीच्या धर्तीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नगरविकास विभागाला निर्देश

ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आर्थिक धोरणे तयार करण्याचे महत्त्व पंतप्रधानांनी या वेळी अधोरेखित केले. तसेच केंद्र सरकारने ग्रामीण भागांसाठी आणलेल्या विविध योजनांचा उल्लेख आपल्या भाषणात केला. स्वच्छ भारत मिशनचा भाग म्हणून शौचालये, पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भारतातील कोट्यवधी लोकांना पक्की घरे याशिवाय जलजीवन मिशनच्या माध्यमातून शुद्ध पिण्याचे पाणी लोकांपर्यंत पोहोचवल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान किसान सन्मान निधी, आयुष्मान भारत अशा योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केल्याचे या वेळी मोदी म्हणाले.

ग्रामीण भारताची उद्याोजकता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने ग्रामीण भारत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ४ ते ९ जानेवारी दरम्यान होणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. ‘विकसित भारत २०४७साठी एका लवचीक ग्रामीण भारताची निर्मिती’ अशी या कार्यक्रमाची थीम आहे. विविध चर्चा, कार्यशाळांच्या माध्यमातून ग्रामीण पायाभूत सुविधा वाढवणे, स्वावलंबी अर्थव्यवस्थेची निर्मिती आणि ग्रामीण समुदायांतील नवकल्पनांना प्रोत्साहन हे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे.

ग्रामीण भागातील लोकांना सन्मानपूर्वक जीवनाची हमी ही आपल्या सरकारची प्राथमिकता असल्याचे मोदी म्हणाले. तसेच सशक्त ग्रामीण भारत निर्माण करणे, येथील लोकांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देणे, स्थलांतर कमी करणे आणि याद्वारे गावातील लोकांचे जीवन सुखकर बनवणे हा आपल्या सरकारचा मुख्य कार्यक्रम असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button