संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू
नवी दिल्ली – देशातील कोरोनाच्या वाढत्या संकटातच आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. १ ऑक्टोबरपर्यंत या अधिवेशनाचे कामकाज चालेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच यंदा संसदेच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन एकत्र घेण्यात आले आहे. तर संसदेत खासदारांच्या बसण्याची व्यवस्थाही सामाजिक अंतराचे पालन करूनच करण्यात आली आहे.
अधिवेशात यंदा सलग १८ बैठका पार पडतील, ज्यामध्ये ४५ विधेयक आणि ११ अध्यादेश आणले जातील. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देशाचे तेरावे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. त्यानंतर कामकाज सुरू होईल. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज आठवड्याच्या सातही दिवशी सुरू असेल. यावेळी आठवड्याची सुट्टी मिळणार नाही. दररोज ४ तास दोन्ही सत्रांचे कामकाज सुरू राहील. तर अधिवेशनाचा पहिला दिवस वगळता उर्वरित इतर दिवशी राज्यसभा सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत पार पडणार असून लोकसभा दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत असेल अशी माहिती देण्यात आली आहे.
महत्त्वाचे म्हणजे यंदा अधिवेशनाच्या कार्यकाळात कोणतेही खासदार एकमेकांच्या संपर्कात येऊ नये यासाठी प्लास्टिकच्या शीटचाही वापर केला असल्याची माहिती मिळत आहे. इतकेच नाही तर खासदारांना ‘अटेंडन्स रजिस्टर’ अॅपद्वारे हजेरी लावण्याची परवानगी देण्यात आली आहे.