संयुक्त राष्ट्रमध्ये इम्रान खान यांनी गरळ ओकली, भारताने भाषणावर बहिष्कार घालत दिले चोख उत्तर
संयुक्त राष्ट्रे – संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीरचे रडगाणे गायले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करताना पुन्हा एकदा काश्मीर राग आळवला. तसेच गांधी-नेहरूंच्या धर्मनिरपेक्ष विचारांना सोडचिठ्ठी देऊन भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न आरएसएसकडून सुरू आहे, दावा इम्रान खानने केला. दरम्यान, इम्रानने भारताविरोधात बोलण्यास सुरुवात केल्यावर संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या प्रतिनिधींनी त्याचा निषेध म्हणून सभागृहातून वॉकआऊट केले.
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये पाकिस्तानकडून सालाबादप्रमाणे काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच भारताविरोधात आक्षेपार्ह दावे करण्यात आले . त्यानंतर भारताच्या प्रतिनिधींनी इम्रान खान यांच्या भाषणावर बहिष्कार टाकला. कोरोना विषाणूच्या फैलावाच्या धोक्यामुळे यावेळी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेचे आयोजन व्हर्चुअल पद्धतीने होत आहे.