विकास दर चालू वित्त वर्षांत उणे असेल – निर्मला सीतारामन
नवी दिल्ली – कोरोनाचा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अनेक उद्योग रसातळाला गेले. अशात आता सुधाराबाबत आश्वासक मत व्यक्त करत देशाचा विकास दर चालू वित्त वर्षांत उणे मात्र शून्य टक्के असेल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल (२७ ऑक्टोबर) स्पष्ट केले आहे.
कोरोना आणि लॉकडाऊनच्या सुरुवातीला, एप्रिल ते जून दरम्यान सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) उणे २३.९ टक्के नोंदले गेले आहे. मार्चअखेर विकास दर उणे ९ टक्के राहण्याचा अंदाज रिझव्र्ह बँकेनेही वर्तविला आहे.
‘सेरावीक’ या ऊर्जाविषयक चर्चामंचावरून भाष्य करताना अर्थमंत्र्यांनी देशाच्या अर्थसुधाराचे चित्र आता दिसत असून अर्थवाढीचा वेग उणे स्थितीत किंवा शून्यानजीक राहण्याची शक्यता व्यक्त केली.
सीतारामन म्हणाल्या की, चालू वित्त वर्षांच्या पहिल्या तिमाहीत विकास दर वेगाने खाली असला तरी सध्याच्या उत्सवी कालावधीत ग्राहकांकडून वस्तूसाठी मागणी वाढली आहे. पायाभूत सुविधा, वित्ततंत्र सेवा तसेच रोजगार निर्मिती, उद्योगांची मालमत्ता निर्मिती वाढणे हीदेखील सकारात्मक बाब आहे.
सप्टेंबरमध्ये खासगी क्षेत्रातील निर्मिती क्षेत्राच्या निर्देशांकाचा (पीएमआय) उल्लेख करत अर्थविकासाचा हा पैलू २०१२ नंतरच्या सर्वोच्च टप्प्यावर (५६.८ अंश) असल्याचेही त्यांनी सांगितले. जलद वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताचे बिरुद पुन्हा असेल, असेही त्या म्हणाल्या आहेत.
वित्त वर्ष २०२०-२१ मध्ये भारताचा विकास दर उणे स्थितीत राहण्याबाबत अनेक आघाडीच्या स्थानिक, आंतरराष्ट्रीय वित्त संस्था, पतमानांकन संस्थांनी अंदाज वर्तविले आहेत. अमेरिकी स्टॅण्डर्ड अँड पूअर्सने (एस अँड पी) उणे ९ टक्के तर मूडीजने तो उणे ११.५ टक्के असे यापूर्वीच म्हटले आहे.