वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच दारुच्या पार्ट्या, प्रहारकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या दरवाजात बाटल्यांचा खच
वर्धा | प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांना वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दारुच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या आहेत. यानंतर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी या सर्व रिकाम्या दारुच्या बाटल्या थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षाच्या दारासमोरच उभ्या केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात दारुच्या रिकाम्या बॉटलचा खच आढळल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ओल्या पार्ट्यांचे पितळ उघड पडल्याचीही चर्चा या निमित्ताने रंगली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच दारुच्या रिकाम्या बॉटल आढळल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात नेमकं कोण दारु रिचवतंय? असाच प्रश्न प्रहार संघटनेने उपस्थित केलाय. चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षासमोर दारु बाटल्यांचा खच आणून ठेवल्याने प्रशासनाचीही चांगलीच तारांबळ उडाली. वर्धा दारुबंदीचा निर्णय घेतलेला जिल्हा असताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून जंग्गी पार्ट्या होत असल्याची चर्चा होती.
त्यानंतर आता प्रहार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील रिकाम्या दारुच्या बाटल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर आणून ठेवल्याने या प्रश्नाला चांगलीच वाचा फुटली आहे.