रविवारी प्रत्येक भारतवासीयांकडे मोदींनी मागितला 9 मिनिटांचा वेळ
“कोरोना विषाणूच्या महामारीमुळे जगात अंधकार पसरला आहे, हा अंधार आपल्याला निरंतर प्रकाशानं दूर करायचा आहे. यासाठी रविवारी ५ एप्रिलला प्रत्येक भारतवासीयांनी ९ मिनिटांचा वेळ द्यायचा आहे. यासाठी रात्री नऊ वाजता सर्वांनी आपल्या घराचे दिवे बंद करायचे आहेत. या नऊ मिनिटांत प्रत्येकांनी दरवाज्यात किंवा बालकनीत उभं राहून मेणबत्ती, दिवा लावून किंवा टॉर्च, मोबाइलची फ्लॅशलाइट सुरु करून अंधकार दूर करायचा आहे”, असं आवाहन मोदींनी केलं आहे.
या दिवशी प्रत्येकानं प्रत्येकाला तिमिरातून तेजाकडे नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. कोरोनाच्या संकटामुळे देशातील गरीब भावंडांमध्ये नैराश्येचं वातावरण आहे, म्हणूनच त्यांना निराशेतून आशेकडे न्यायचं आहे. दारात एक दिवा लावताना आपण या लढाईत एकटं नाही असं एकमेकांना सांगून निराशेचा अंधकार दूर करण्याचा संकल्प करायचा आहे असंही मोदींनी सांगितलं मात्र हे करत असताना कोणीही एकत्र यायचं नाही किंवा रस्त्यावर जमायचं नाही, सोशल डिस्टन्सचं भान ठेवून प्रत्येकानं अनुकरण करायचं आहे असाही संदेश त्यांनी देशवासीयांना दिला आहे.
२२ मार्चला मोदींनी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं होतं. या दिवशी संध्याकाळी पाच वाजता घराच्या खिडकीत, बाल्कनीत येऊन लोकांनी घंटा, थाळी नाद करून, टाळ्या वाजवून आरोग्य सेवा देणाऱ्यांचे आभार मानले होते. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोदींनी थाळीनादाचं आवाहन केलं होतं. याला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला, मात्र काही लोकांनी यावेळी रस्त्यावर येऊन हैदोस घातला, या घटनेची पुनरावृत्ती होऊ देऊ नका अशी विनंती त्यांनी कोट्यवधी देशवासीयांना केली आहे.