breaking-newsताज्या घडामोडीलेख

रमजान महिन्यातील रोजे आणि त्याचा मानवी आरोग्यासाठी वापर- डॉ सुनील गंधे

लेखक
डॉ सुनील गंधे चिकित्सक व इस्लाम तत्वानुसार गेली १२ वर्षे संपुर्ण नियमांचे पालन करुन रोजे धरणारे जमाते हिंद चे सदस्य

अउजुबिल्लाहीमिनशैतानिरजिम। बिस्मिल्लाहेरहेमानेरहिम।। रोजे अर्थात उपवासाची संकल्पना सर्वच धर्मात आहे, मात्र रमजानचे रोजे थोडेशे वेगळे आहेत. इतर उपवासा प्रमाणे यात दिवसा कांही पदार्थ खाण्या पिण्याची परवानगी नाही.अगदी तोंडात सुटलेली लाळ सुद्धा.

रोज्यांमध्ये सुर्योदयापूर्वी खाणे अपेक्षित आहे तर सूर्यास्तानंतर जेवण करण्याची परवानगी आहे.
दरम्यानच्या सुमारे १४तासांच्या कालावधीत काही सुद्धा खाण्यापिण्याची परवानगी नाही.
शिवाय हे रोजे सतत किमान ३० दिवस ठेवणे अनिवार्य आहेत. रोजांचा हा काळ शरिराची अत्यंत कठोर परीक्षा घेणारा असतो. मुस्लिम समाजातील बहुसंख्य लोक हे खडतर रोजे जरी लिलया ठेवत असले तरी मुस्लिमेत्तर लोकही रोजे करतात. काहींचा असा ही अंदाज असतो की येवढे खडतर रोजे ठेवल्याने त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होत असावा. म्हणून आज याच विषयावर चर्चा करूया.
मुळात रोजा ठेऊन जो उद्देश साध्य करावयाचा आहे तो शारीरिक कमी मानसिक जास्त व अध्यात्मिक सर्वोच्च आहे.
रोजा एकादश इंन्दियांचा आहे.मानसिक फायद्यांबरोबर रोजांचे अनेक शारीरिक फायदे ही आपोआप प्राप्त होतात हे ओघानेच आले.
🟣 कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ” हे श्रद्धावंत मुस्लिमानों ! तुमच्यावर रोजे अनिवार्य करण्यात आलेले आहेत ज्या प्रमाणे तुमच्या अगोदरच्या प्रेषितांच्या समुदायांवर अनिवार्य केले गेलेले होते. यामुळे आशा आहे की, तुमच्यामध्ये तक्वाचे (चारित्र्याचे) गुण उत्पन्न होतील.”
(सुरे बकरा आयत नं.१८३). याचा अर्थ रोजे माणसा मध्ये चांगले चारित्र् निर्माण करण्याला आवश्यक असणारे सर्व गुण निर्माण करतात.

ते गुण कसे निर्माण होतात?
सांगतो .श्रद्धा व भक्ती या मानसिक गोष्टी व शारीरिक उपवास यामुळे आरोग्य प्राप्त होते.
आरोग्याला काय फायदे होतात? शारीरिक फायदे


१.वजन कमी होते.
सतत एक महिना नियमितपणे १४ तास उपाशी राहिल्यामुळे रोजेधारकांचे वजन कमी होते. टेक्सास विद्यापीठाने या संबंधी जे संशोधन केलेले आहे त्यात म्हटलेले आहे की, बराच काळ रिकाम्यापोटी राहिल्याने किंवा सातत्याने कमी खाल्ल्याने शरिराचे वजन कमी होते. रोजे केल्याने शरिरातील पेशींवर ताण पडतो तसेच संचित अन्न वापरले जाते त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

२.घातक कोलेस्ट्रॉल कमी होतो.
अनेक आहार तज्ज्ञांचे यावर एकमत आहे की रमजानचे रोजे ठेवल्याने वजन कमी होण्यासोबतच रक्तातील कोलेस्ट्रॉलची मात्र सुद्धा कमी होते. त्यामुळे हृदयाची क्षमता वाढते. हृदयघात आणि स्ट्रोक सारख्या गंभीर आजारापासून माणूस सुरक्षित राहतो.

३.पचनक्रिया मजबूत होते.

आपण वर्षभर भरपूर खात आणि पीत असतो. अनेकजणांना घास 32 वेळा चाऊन खाने गरजेचे असते याची एक तर माहिती नसते किंवा वेळ नसतो. त्यांना एवढे सुद्धा कळत नसते की प्रत्येक घास खूप चाऊन त्याची पेस्ट करून पोटात ढकलायचा असतो, कारण दात तोंडात असतात पोटात नाही. नशा करणार्‍या लोकांबद्दल तर काही बोलायला नको. जरी दारू सेवनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी येत असली तरी त्यामुळे स्वतःच्या पचन संस्थेला जबर नुकसान सोसावे लागते. घास व्यवस्थितरित्या चर्वण न करण्याची सवय ही सामान्य सवय आहे. म्हणून अर्धवट चावलेले अन्न नित्यनेमाने पोटात ढकलले जात असल्याने पचन क्रियेवर सातत्याने अतिरिक्त ताण पडत असतो. ही जवळ-जवळ सर्वांचीच परिस्थिती आहे. पोटाला स्वतःच्या कामाबरोबर दातांचेही काम करावे लागते. रोजांच्या काळात दिवसभर काहीही पोटात जात नसल्यामुळे पोटाला अर्थात पचन संस्थेला आराम मिळतो. झोपल्याने जसे शरीर ताजे तवाने होते तसेच रोजे राहिल्याने पचनसंस्था ताजी तवानी होते. सातत्याने १४ तास लांब कालावधीसाठी उपाशी राहिल्याने शरिरात अ‍ॅडीपोनेक्टिन नावाचेे हारमोन तयार होते जे की पचन संस्थेला अन्नातील पौष्टिक घटक पचविण्यास मदत करते. थोडक्यात सतत 30 दिवस रोजे केल्याने पचन संस्था सुधारते.

४.रोजामुळे वाईट सवईपासून सुटका होऊ शकते.
तंबाखू, पान, बिडी, सिगारेट, दारू,चहा, कॉफी, सिंथेटिक कोल्ड्रींक्स या सारख्या वाईट सवई रमजानच्या 30 दिवसांच्या रोजांच्या पालनामुळे सुटण्यामध्ये मदत होते. सहसा या गोष्टी सोडण्यासाठी जो मनोनिग्रह लागतो तो फार कमी लोकांत असतो. ज्यांच्यात नसतो त्यांच्यासाठी रमजान महिना या सवई सोडण्याची सुवर्ण संधी असते. रोजांच्या काळामध्ये जराशी इच्छा शक्ती दाखवली तरी ती या सर्व व्यसनांपासून मुक्त होण्यास पुरेशी असते. ५.घातक आजारांपासून सुटका सतत उपाशी राहिल्याने आपल्या शरिरातील पेशी ह्या अगोदर आपल्या शरिरातील अतिरिक्त चरबी व त्यानंतर अतिरिक्त पेशींना खाऊन नष्ट करतात याला ऑटोफॅगी प्रक्रिया असे म्हणतात.

यामुळे शरिरातील वाईट पेशी नष्ट होतात. रोजांमुळे ही प्रक्रिया नकळत आपल्या शरिरात घडते व आपल्याला कळत सुद्धा नाही की आपल्या शरिरात निर्माण झालेल्या वाईट (जहरी) पेशी ज्यात कँसरच्या पेशी सुद्धा असू शकतात सततच्या रोजांमुळे कधी नष्ट होतात ते. हा एक मोठा रिसर्च आहे जिचा गाभा मी आपल्या समोर ठेवलेला आहे. ऑटोफॅगी एक ग्रीक शब्द आहे, ज्याचा अर्थ ’स्वतःला खाऊन टाकने’ असा होतो.

हा शोध एवढा महत्वपूर्ण होता कि २०१६ चा नोबेल पुरस्कार ऑटोफॅगी सिद्धांतांचे जनक शरिर शास्त्राचे जपानचे वैज्ञानिक योशिनोरी ओसुमी यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.येणेप्रमाणे रोजांमुळे शरिराला अनेक फायदे मिळतात पण हो! हे फक्त निरोगी व्यक्तींना मिळतात. जे लोक आजारी असतील व सतत मेडीकल सुपरविझन खाली असतील. व डॉक्टरांनी ज्यांना उपवास वर्ज्य सांगितले आहेत त्यांच्या साठी हे फायदे होणार नाहीत हे ओघाने आलेच.

चुकीच्या सवयी

अडानीपणा आणि आरोग्यविषयक जागरूकते च्या अभावामुळे अनेक मुस्लिम दिवसभर रोजा ठेऊन संध्याकाळी इफ्तार करतांना भयंकर चुका करतात.
रस्त्यावर विक्रीला ठेवले गेलेले व तळलेले अनेक पदार्थ उदा. भजे, मिर्च्या, समोसे, चिकन यासारखे मैद्याचे व निकृष्ट हरभर्‍याच्या पिठाचे पदार्थ खातात.
हे पदार्थ चवीला जेवढे रूचकर असतात तेवढेच पचनसंस्थेला घातक असतात.

🟣 यांच्याशिवाय उपवास सोडताना लगेच भरपूर जेवण केले जाते व ढसाढसा पाणी पिले जाते. हा अतिशय चुकीचा पायंडा समाजात पडलेला आहे. यामुळे पोटात या विषम पदार्थांची सरमिसळ होऊन पचनसंस्थेवर अधिक ताण पडतो.

🟣 हेच कारण आहे की, रमजानमध्ये अनेक लोकांना अपचनाचा विकार जडतो. म्हणून इफ्तारमध्ये चार दोन खजूर आणि चार-दोन फळांचे घास घेऊन थोडेसे साधे पाणी पिऊन ते पचेपर्यंत साधारणतः एकाद तास थांबून जेवण करणे केव्हाही हिताचे.तरावीहच्या नमाजनंतर जेवण केले तर ते अधिक चांगले. जेवणानंतर साधारणतः एक-दोन किलोमीटर पायी चालणे गरजेचे असते. हिंदू धर्मात सुद्धा जागर किंवा नवरात्री हे उपवास सुद्धा यासारखे च.
सहेरीमध्ये सुद्धा हलके आणि थोडे खाणे अपेक्षित असते. रमजान दरम्यान खाण्या-पिण्याच्या सवयी राखण्यात ज्यांना अपयश येते त्यांचे रमजान नंतर वजन वाढल्याचे सुद्धा लक्षात येईल. म्हणून कमी खाणे, जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर लगेच कमी पाणी पिणे वगैरे सवयी लावून घेतल्या पाहिजेत. रात्रीचे जेवण झाल्यानंतर साधारण ४५ मिनिटानंतर भरपूर पाणी पिल्यास हरकत नाही.

मनोवैज्ञानिक फायदे

फक्त दिवसभर काही न खाणे आणि न पिणे यालाच बहुतेक लोक रोजा समजतात. पण प्रत्यक्षात तसे नाही. रमजानमध्ये दिवसा उपाशी राहणे हा शरिराचा रोजा झाला. पण वाईट न पहाणे, वाईट कृत्य न करणे, वाईट न बोलणे, वाईट न ऐकणे, सतत इबादत करत राहणे, रात्रींची २० रकाअत अतिरिक्त नमाज अदा करणे, सतत पवित्र वातावरणात रहाणे अपेक्षित आहे.

एरव्ही माणसे छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल आपसात वाद घालत असतात. रोजांच्या अवस्थेत त्यापासून रोखलेले आहे. शांत राहणे, कुणाशीही वाद न घालणे, पुढचा स्वतः होऊन वाद घालत असेल तर तरी त्याला अतिशय नम्रपणे ’मी रोजादार आहे’ येवढंच उत्तर देणे अपेक्षित असते.

गरीबांना आपल्या बचतीतून २.५ टक्के जकात देणे व घरातील प्रत्येक लहान-थोरांच्या नावे पावणे दोन किलो गहू अथवा त्याची किमत गरीबांमध्ये फितरा (दान) म्हणून ईदच्या नमाजला जाण्यापूर्वी अदा करणे, सातत्याने कुरआनचे पठण करणे, वगैरे क्रिया या महिन्यात महिनाभर केल्या जातात. ज्यांचे अतुलनीय असे मानसिक लाभ मिळतात व रोजादाराचे चारित्र्य या 30 दिवसांच्या कठीण उपासनेच्या मुशीतून ताऊन-सुलाखून निघते.

रोजादारांना यातून एवढी ऊर्जा मिळते की पुढील रमजानपर्यंत चांगले चारित्र्य जपण्यासाठी ती पुरेशी ठरते. थोडक्यात रमजानच्या रोजांमुळे माणूस आरोग्यवानच नव्हे तर चारित्र्यवान सुद्धा बनतो. आज जगाला चारित्र्यवाण लोकांची किती गरज आहे हे आपल्यातील प्रत्येकजण जाणून आहे.
नमाजी, रोजा ठेवणारे लोक ज्या क्षेत्रात असतील त्या क्षेत्रात आपल्या चांगल्या चारित्र्याने वेगळा ठसा उमटवत असतात. अशा लोकांवर विश्‍वास ठेवतांना कोणालाच अडचण वाटत नाही. किंबहुणा अनेक लोक अशाच लोकांशी व्यवहार करण्यास प्राधान्य देतात.

अलिकडे मीडियाच्या दुष्प्रचारामुळे अनेक चांगल्या गोष्टी वाईट ठरविल्या जात आहेत. ताजे उदा. पहा, लॉकडाऊनमध्ये दूध आणायला जाणारे लोक पोलिसांचा मार खात आहेत आणि दारू आणायला जाणारे लोक सुरक्षित आहेत.
असेच काहीशे मुस्लिमां बद्दल झालेले आहे. मुस्लिमां मध्ये असलेल्या नसलेल्या दुर्गुंणाचे चर्वण नियमितपणे माध्यमांवर केले जात असल्यामुळे सामान्य जनतेला इस्लाम काही तरी भयंकर आणि मुस्लिम म्हणजे दानव वाटत आहेत. पण प्रत्यक्षात तसे नाही.
इस्लाम नितांत सुंदर धर्म आहे आणि रोजे मुस्लिमांना दरवर्षी मानसिक व शारीरिक बळ प्राप्त करून देण्यामध्ये महत्वाची भूमिका अदा करतात.
हज यात्रेमध्ये शेवटी अराफात चे मैदानात नमाज पठण झाल्यावर गाईचे दुध पिण्यास सांगितले आहे व हे पवित्र कर्म म्हणून वर्णन केले आहे.
इस्लाम धर्मातील मांसाहार हा आवश्यक म्हणून सांगितला नसुन हिंदू धर्मातील जत्रा प्रमाणेच हा काहीसा प्रकार आहे.
रोजा धरणास पात्र कोण?अपात्र कोण? याचा सविस्तर उल्लेख कुराण शरिफ ग्रंथात व अनेक हदीस ग्रंथात आहे.
शेवटी एकच सांगतो रोजा हा इस्लाम चा नियम आहे अपवाद नाही. पण आज समाजाने धर्मातील नियमांना अपवाद समजले आहे व अपवादाला नियम।।।

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button