मोदी सरकार इंग्रजांसारखेच; काँग्रेसचा घणाघात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/718151-pm-modi-pti.jpg)
दिल्ली – दिल्लीत शेतकऱ्यांवर पोलिसांनी बळाचा वापर केल्यानंतर विरोधकांनी भाजपा सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी मोदी सरकारने ते इंग्रजांपेक्षा वेगळे नाहीत हे दाखवून दिले. इंग्रजांनी आधी शेतकऱ्यांचे शोषण केले होते. आता मोदी सरकारही शेतकऱ्यांवर अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर करत आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.
मंगळवारी दिल्लीच्या वेशीवर धडकलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला पोलिसांनी रोखले. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच त्यांच्यावर पाण्याचा माराही केला. या घटनेचे पडसाद राजकीय क्षेत्रातही उमटले आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी भाजपा सरकारची तुलना थेट इंग्रजांशी केली. मोदी सरकार हे इंग्रजांसारखेच असल्याचे त्यांनी दाखवून दिले. इंग्रजांनी आधी शेतकऱ्यांचे शोषण केले होते. आता मोदी सरकारही शेतकऱ्यांवर अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर करत आहे, असे त्यांनी सांगितले. हजारो शेतकरी त्यांच्या मागण्या घेऊन शेकडो किलोमीटर चालत तुमच्या दारी आले. जर तुम्ही खरंच महात्मा गांधी यांचे विचार आत्मसात केले असते तर तुम्ही शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करण्याऐवजी त्यांच्या मागण्या मान्य केल्या असत्या. आता लवकरच ‘शेतकरी विरोधी – नरेंद्र मोदी’, हा नवा नारा ऐकू येईल, असे काँग्रेसने म्हटले आहे.