मुंबई पाठोपाठ आज सकाळी नाशिक शहरही भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं
दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. मात्र आता मुंबई पाठोपाठ आज म्हणजे 8 सप्टेंबर रोजी नाशिक शहरही सकाळी भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी हादरल्याची माहिती National Centre for Seismology विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान त्यांच्या माहितीनुसार, आज सकाळी 9 वाजून 50 मिनिटांनी सुमारे 3.8 रिश्टल स्केलचा भूकंप झाला आहे. हा भूकंप नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेला 103 किमीला बसल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान आज सलग दुसर्या दिवशी पालघर, तलासरी, डहाणू भागालाही भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान काल देखील पालघर मध्ये भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला होता. यामध्ये जीवितहानी झालेली नसली तरीही भूकंपामुळे पालघर मध्ये घराच्या भिंतीला तडे गेल्याची माहिती आहे. आज पालघर मध्ये देखील झालेला भूकंप 3.8 रिश्टल स्केलचा आहे. मागील महिन्यात पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात भूकंपाचे सहा सौम्य धक्के बसले होते. या सर्व भूकंपाचे केंद्रबिंदू डहाणू तालुक्याच्या परिसरात होते. तसेच केंद्रबिंदूची खोली पृष्ठभागापासून दहा किलोमीटर होती.
मुंबईमध्येही मागील 1-2 दिवसांत भूकंप झाल्याची माहिती देण्यात आली होती. दरम्यान अचानक मुंबई परिसरात मध्यरात्री मेघगर्जना, वीजांचा कडकडाट झाल्याचा अनुभव मुंबईकरांनी घेतला आहे. काल म्हणजे 7 सप्टेंबर सकाळी मुंबईच्या उत्तर दिशेला 3.5 रिश्टेर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले. मुंबई च्या उत्तर दिशेला सुमारे 102 किमी दूर 3.5 रिश्टल स्केलचा भूकंप झाला आहे. दरम्यान शनिवारी 5 सप्टेंबरला देखील मुंबईच्या उत्तर दिशेस 98 किमी अंतरावार 2.7 रिश्टेर स्केल तीव्रतेचा भूकंपाचे धक्के जाणवले होते.