breaking-newsताज्या घडामोडी

Mahashivratri : महाशिवरात्रीचे महत्व आणि कथा

महाईन्यूज | प्रतिनिधी | मयुरी सर्जेराव |

हर हर महादेव…

माघ महिना उगावला,की येते ती शिवरात्री…मोठी शिवरात्री असल्यानं सर्वचजण ही शिवरात्री अगदी काटेकोरपणे पाळतात…घरात लगेच पुजा-पाठाला सुरवात होते…घरातली मोठी माणसं शिवलिलामृत, काशीखंड ह्या सारख्या ग्रंथांच वाचन सुरू करतात. कुणी ‘ॐ नमः शिवाय’ ह्या पंचाक्षरी मंत्राचा जप करतात, तर कुणी महाशिवरात्री औचित्य साधून बारा ज्योतीर्लिंगे किंवा पुरातन शिव मंदिरांना आवर्जून दर्शन भेट देतात. काहींच्या मते या दिवशी भगवान शंकरांच्या तिर्थस्थळाला भेट देऊन अभिषेक घालतात त्यांच्यासाठी हा दिवस पर्वणीच ठरतो…संस्कृत पुराण साहित्यापैकी अग्नी पुराण, शिव पुराण, पद्म पुराण या ग्रंथांमध्ये महाशिवरात्री व्रताचे महत्त्व सांगितले आहे…

दिवशी बेलाची पाने वाहून शिवाची पूजा करावी असे या व्रताचे स्वरूप आहे. समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी महादेवांनी प्राशन केले होते आणि संपूर्ण जगाला विनाशापासून वाचवले होते म्हणून त्यांचा आभार म्हणून किंवा ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री मानला गेला आहे.या दिवशी महादेवांनी शिवलिंगाचे रुप धारण केल्याचही म्हटलं जातं. महाशिवरात्रीला रात्री 12 ते 3 या प्रहरात महादेवांचा जागर केला जातो.

ह्या पवित्र दिवशी शिवशंकराला रुद्राभिषेक करणे, जप करणे, बेल पत्र वाहणे, उपास करणे अशा अनेक गोष्टी आवर्जून केल्या जातात. शिव म्हणजे कल्याण, शिव म्हणजे ज्ञान, महाशिवरात्रीच्या उपासनेमुळे उपासकाचे निश्चितच कल्याण होते. त्याला ज्ञान प्राप्त होते. त्याला उत्कर्षाचा, मुक्तीचा विकासाचा मार्ग सापडतो.असं मानलं जात.

आपण जर भगवान शंकराच्या पोथ्या वाचल्या तर त्यात शिव उपासनेमुळे माणसाच्या दृष्ट प्रवृत्ती कशा बदलतात, सदाचार, विवेक खऱ्या अर्थाने कसा जागा होतो, हे सांगितलेलं असंत…अशा अनेक ग्रंथ किंवा पोथ्यांमधली शंकराच्या उपासनेसाठी महत्त्वाची मानली जाते त्यांपैकी ती पोथी म्हणजे ‘शिवलिलामृत’… या पोथीमध्ये शंकरांच्या उपासनेचं फळ किती श्रेष्ठ असतं हे सांगणारी एक अख्यायिका सांगितली आहे.तर ती अख्यायिका अशी आह

“असाच एक महाशिवरात्रीचा दिवस. एक पारधी शिकार करायची म्हणून जंगलात गेला. जलाशयाच्या एका वृक्षावर जाऊन बसला. पाणी पिण्यासाठी म्हणून एखादं सावज आलं, एखादा प्राणी आला की त्याची शिकार करायची हा हेतू त्याचा होता. दुपारपासून धनुष्य बाण सज्ज करून तो बसला खरा !… पण… दिवस गेला-संध्याकाळ झाली, सूर्य अस्ताला गेला, तिन्ही सांजा होऊ लागल्या तरी एक ही प्राणी त्या जलाशयाकडे आला ही नाही अन्‌ शिकार मिळालीही नाही.

तेवढ्यात काही हरणं पाणी पिण्यासाठी म्हणून तिथं आली. पारध्याने धनुष्याची दोरी मागे खेचली. तो आता बाण सोडणार तोच त्या हरिणांचा प्रमुख पुढे आला आणि पारध्याला म्हणाला, हे पारध्या ! तू तर शिकारी आहेस. शिकार करणे हा तुझा धर्म आहे. तू आम्हाला मारणार हे ही खरं आहे. पण त्या आधी आमची एक विनंती ऐक. आम्ही एकदाच आमचं कर्तव्य पूर्ण करून येतो.

आमच्या कुटुंबियांना भेटून येतो मग तू आम्हाला मार. खरं तर हातातोंडाशी आलेली शिकार जाऊ कशी द्यायची. पण त्या हरिणाच्या प्रमुखानं परत येण्याच वचन दिलं. तेव्हा पारधी म्हणाला “ठीक आहे उद्या सकाळच्या सूर्योदयापूर्वी मात्र तुम्ही आलं पाहिजे.”

हरिणाच्या कळपांनी ते मान्य केलं आणि ती निघून गेली.आता रात्र कशी काढायची.तोच दूरवरच्या मंदिरातून घंटानाद ऐकू आला. पाठोपाठ ॐ नमः शिवाय म्हणण्याचा आवाज त्याच्या कानी पडला. नकळत नाममंत्राची पारध्याला गोडी लागली.ते ऐकत ऐकत तो ज्या वृक्षावर बसला होता, त्याची पानं तोडून तो खाली टाकू लागला.तो नेमका बेलाचा वृक्ष होता.आणि त्या वृक्षाखाली एक शिवपिंड होती…ती बेलाची पाने पारध्याच्या हातून नेमकी वृक्षाखालच्या शिवपिंडीवर पडत होती.आणि नकळत त्याच्या हातून ती शिवपूजा घडत होती.

तेवढ्यात हरिणांचा कऴप तिथे आला …त्यातला वचन दिलेला प्रमुख हरिण त्या पारध्याला म्हणाला “पारध्या सोड बाण, मी माझं कुटुंब प्रमुखाचं कर्तव्य पूर्ण करून आलोय. मला आता मार…” इतक्यात एक हरिणी पुढे येऊन म्हणाली. “त्याला नको मला मार, तो माझा पती आहे. त्याच्या आधी मला मार. मला माझा पत्नी धर्म पाळू दे.” तेवढ्यात ती पाडसं पुढे आली आणि म्हणाली त्या दोघांआधी आम्हाला मार.ते आमचे आई वडील आहेत. आम्हाला आमचा पुत्र धर्म पाळू दे. त्यांच रक्षण करू दे.

एका पाठोपाठ एक अशी प्रत्येकाचीच दुसऱ्याला वाचवायची व कर्तव्य दक्षतेची चढाओढ पाहिली अन पारध्याने विचार केला, हे प्राणी आपला धर्म कर्तव्य पाळतात तर मी का दयेचा धर्म पाळू नये. त्याची शिकार करून पापाचा धनी का होऊ.पारध्यानं सर्वानाच जीवनदान दिले.

भगवान शंकर हे पाहून प्रसन्न झाले. त्यांनी सर्वांचाच उद्धार केला. हरिणांना मृग नक्षत्र म्हणून अन्‌ पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून आकाशात कायमचे स्थान दिले. हे सारं घडलं तो दिवस होता महाशिवरात्रीचा…

महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते.पंचगव्य म्हणजे गायीचे दूध,तूप,शेण, गोमुत्र आणि दही

लावून शिवलिंगाला अभिषेक करतात.त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात. त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच तसेच पांढरी फुले वाहिली जातात… शिवलिंगावर दह्यापासून बनवलेला चक्का थापण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे…या दिवशी धोत-याचं फुलं वाहण्याला विशेष महत्त्व दिलं जात… तसेच कोणाला शंकराच्या सोळा सोमवराचं व्रत श्रावण महिना सोडून इतर महिन्यापासून करायचं असेन तर शिवरात्रीचा दिवस उत्तम मानला जातो…

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button