महाराष्ट्र, दिल्ली, तेलंगणा, राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये Lockdown…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Corona-6.jpg)
नवी दिल्ली | जगभरात थैमान घालवणाऱ्या कोरोनाला रोखण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. यासाठीच देशभरातील अनेक राज्यांनी संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. महाराष्ट्रासह दिल्ली, तेलंगणा आणि राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. भारतात आतापर्यंत 341 रुग्णांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला.
यातील 23 जण उपचारानंतर कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत. या व्यतिरिक्त 5 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोना संसर्गित रुग्णांमध्ये 39 परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. देशभरात आत्तापर्यंत 23 राज्यांमध्ये कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी देशातील अनेक राज्यांनी सज्ज होत संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात कलमा 144 लागू करत जमावंबदीचा निर्णय घेतला आहे. आज (22 मार्च) मध्यरात्रीपासून राज्यात कलम 144 लागू झाल्यानंतर 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल. या व्यतिरिक्त त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती 25 टक्क्यांवरुन 5 टक्क्यांपर्यंत कमी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी नागरिकांकडे सहकार्य करण्याची विनंती केली. अत्यावश्यक वस्तूंची कोणतीही कमतरता होणार नाही. त्यासाठी सार्वजनिक वाहतूक सेवेचा उपयोग होईल, असंही त्यांनी नमूद केलं.