मला मुख्यमंत्रीपदी राहण्याची इच्छा नाही – ममता बॅनर्जी
नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांना खळबळ माजली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत ठेवला, मात्र तो फेटाळला गेला. तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्येही तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा पक्षाच्या बैठकीत ठेवला आहे. मला मुख्यमंत्रीपदी राहण्याची इच्छा नाही असं ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे.
यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या की, निवडणुकीच्या काळात केंद्रीय दलाने आमच्याविरोधात काम केलं. पश्चिम बंगालमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण केली गेली. हिंदू-मुस्लिम मतांचे विभाजन करण्याचे राजकारण झाले. त्यामुळे मतं विभागली गेली. आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली मात्र त्याचं काहीच झालं नाही असं त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये भाजपप्रणीत एनडीएने शानदार विजयाची नोंद केली. एकट्या भाजपनेच बहुमतापेक्षा अधिक जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला. यामध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला असून जनतेने जाती-पातीच्या राजकारणाला आणि प्रादेशिक अस्मितेच्या मुद्दाला फाटा दिल्याचे दिसून आले. या निवडणुकीत भाजपने प्रादेशिक पक्षांची देखील धुळाधान केली. तर अनेक राज्यात अपेक्षेपेक्षा उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपने १८ जागांवर विजय मिळविला.पश्चिम बंगालमध्ये भाजपने राबविलेल्या ‘चूपचाप कमल छाप’ मोहिमेची सध्या सगळीकडेच चर्चा आहे.