भारतामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने, कोरोनाबाधितांची संख्या 147 वर
भारतामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने होत आहे. या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. आरोग्य मंत्रालयाने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आणखी 10 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली असून ती आता 147 वर पोहचली आहे. यामध्ये 25 परदेशी नागरिकांचा समावेश आहे.
आरोग्य मंत्रालयाने पुढे असे सांगितलं की, भारतामध्ये कोरोना विषाणूमुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोना विषाणूची लागण झालेल्यां रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 5 हजार 700 नागरिकांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा कहर सुरु आहे. जगभरात कोरोनाने 7 हजार पेक्षा जास्त नागरिकांचा बळी घेतला आहे. तर जगभरात 1 लाख 94 हजार नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.
मिळालेल्या आकडेवारीनुसार, दिल्लीमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेले 10 रुग्ण आढळले आहेत त्यामध्ये एका परदेशी नागरिकाचा समावेश आहे. उत्तर प्रदेशमध्ये 16 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. महाराष्ट्रामध्ये 42 कोरोनाबाधित रुग्ण असून त्यामध्ये 3 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. केरळमध्ये दोन परदेशी नागरिकांसह २७ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर कर्नाटकामध्ये 11 कोरोनाबाधित रुग्ण आहेत.
दरम्यान, लदाखमध्ये 8, जम्मू काश्मीरमध्ये ३ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तेलंगणामध्ये दोन परदेशी नागरिकांसह 5, राजस्थानमध्ये दोन परदेशी नागरिकांसह 4 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. तर हरियाणामध्ये 14 परदेशी नागरिकांसह 16 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.