भारतात कोरोना विषाणूवर आतापर्यंत 86 जणांनी केली मात
भारतात कोरोना विषाणूवर आतापर्यंत ८६ जणांनी मात केली आहे. कोरोना विषाणूविरोधातील जीवन-मृत्यूच्या लढाईत ८६ जणांनी विजय मिळवला असून हे सर्वजण पूर्णपणे ठणठणीत झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना विषाणूचे आतापर्यंत ९७९ पॉझिटिव्ह प्रकरणे समोर आली आहेत. यात २५ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूने सर्वाधिक प्रभावि राज्यात महाराष्ट्र आणि केरळचा समावेश आहे.
देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. परंतु, यादरम्यानही आता दिलासादायक बातम्या येत आहेत. कोविड-१९ मधून आतापर्यंत १० टक्के रुग्ण बरे झाले आहेत. रविवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार कोविड-१९ चे ८६ रुग्ण या विषाणूतून पूर्णपणे बरे झाले आहेत. देशभरातील सध्याच्या रुग्णांच्या संख्येनुसार ही आकडेवारी १० टक्के आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण मोठ्यासंख्येने वाढत आहेत. दोन्ही राज्यातील आकडेवारी २०० च्या नजीक पोहोचली आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या २०३ झाली आहे. तिथे ६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर राज्यात ३४ रुग्ण पूर्णपणे बरेही झाले आहेत.
तर केरळमधील संख्याही १८२ च्या वर गेली आहे. या राज्यात मृत्यूचे प्रमाण कमी आहे. आतापर्यंत एकाच व्यक्तीचा येथे मृत्यू झाला आहे. तर १५ लोक यातून पूर्णपणे बरे झाले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचे ६६ रुग्ण आहेत. येथेही ११ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.