भाजपला आणखी एक धक्का!गोरखा जनमुक्तीदेखील एनडीएमधून बाहेर पडणार
![Karnataka BJP has no differences; Yeddyurappa will remain as the Chief Minister](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/BJP.png)
नवी दिल्ली – भाजपला एका पाठोपाठ एक धक्के बसत आहेत. शिवसेना आणि अकाली दलाने एनडीएला रामराम ठोकल्यानंतर पश्चिम बंगालमधील गोरखा जनमुक्ती मोर्चाने देखील एनडीएमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. तर महाराष्ट्रात देखील भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप पक्ष सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
गोरखा मुक्ती मोर्चाचे नेते बिमल गुरुंग यांनी आपण एनडीएतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून (एनडीए) गोरखा जनमुक्ती मोर्चा बाहेर पडल्याने गेल्या काही काळातला एनडीएसाठी हा तिसरा धक्का आहे.
“भाजपने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. आम्ही त्यांच्यासोबत अनेक दिवस होतो. मात्र आम्हाला दिलेल्या आश्वासनांच्या दिशेने त्यांची पावले पडली नाही. दुसरीकडे मात्र ममता बॅनर्जींनी आम्हाला दिलेली आश्वासने पाळली, आम्हाला दिलेले शब्द पाळले. म्हणून 2021 मध्ये होणाऱ्या पश्चिम बंगालच्या सार्वत्रिक निवडणुकीत आम्ही तृणमुल काँग्रेसशी युती करुन लढणार आहोत”, असं बिमल गुरुंग यांनी जाहीर केलं आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी गोरख्यांना काही महत्त्वाची आश्वासने दिली होती. मात्र ती पूर्ण करण्यात त्यांना अपयश आलं आहे. त्यांनी आमच्या आश्वसनांची पूर्तता न केल्याने आम्ही एनडीएमधून बाहेर पडत आहोत”, असं गुरुंग म्हणाले.