निर्भया प्रकरणः दोषी अक्षयनेही दाखल केली नवीन दया याचिका, फाशी होणार की नाही ?
निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना वाचवण्यासाठी सातत्याने वेगवेगळे डावपेच खेळले जात आहेत. दोषी अक्षय ठाकूरने शनिवारी पुन्हा एकदा दया याचिका दाखल केली आहे. पहिल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान खटल्याशी निगडीत बिंदुंवर ध्यान देण्यात आले नाही, असे या याचिकेत म्हटले आहे. तत्पूर्वी, शुक्रवारी दोषी पवनकुमारने क्युरेटिव्ह याचिका दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांचे खंडपीठ २ मार्च रोजी सुनावणी करणार आहे. पवनने घटनेवेळी आपण अल्पवयीन असल्याचे अर्जात म्हटले आहे. याप्रकरणी त्याची पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आलेली आहे.
न्या . एन व्ही रमण्णा, न्या. अरुण मिश्रा, न्या. रोहिंग्टन फली नरिमन, न्या. आर भानुमती आणि न्या. अशोक भूषण हे सकाळी १०.२५ वाजता सुनावणी करतील. क्युरेटिव्ह पिटिशनची सुनावणी बंद खोलीत होते. पिटिशनमध्ये मेरिट आहे की नाही, हे न्यायमूर्ती पाहतात. याप्रकरणी उर्वरित इतर तीन दोषींची क्युरेटिव्ह पिटिशन फेटाळण्यात आलेली आहे.
तीन इतर दोषींबरोबर पवनकुमारविरोधात ३ मार्चसाठी डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे. पवनकुमारचे वकील एपी सिंह यांनी म्हटले की, घटना घडली त्यावेळी तो अल्पवयीन होता. त्याला फाशीची शिक्षा दिली जाऊ नये.त्यामुळे फाशी आता ठरलेल्या तारखेला होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.