नागपूरमधील खनिकर्म मुख्यालय गुजरातच्या अहमदाबादेत हलविणार
नागपूर – मध्य भारतातील प्रदेश हा खनिज संपत्तीने खचाखच भरलेला आहे. कोळसा खाणींप्रमाणेच इतर धातूंच्याही खाणी महाराष्ट्रातील नागपूर व त्याच्या आजूबाजूच्या मध्यप्रदेशच्या भागात आढळतात. त्यामुळेच नागपूर येथे भारताचे खनिकर्म मुख्यालय आहे. हे खनिकर्म मुख्यालय आता गुजरातच्या अहमदाबादेत हलविण्यात येणार आहे. त्यामुळे या खनिकर्म मुख्यालयाशी निगडित असलेल्या हजारो कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. लाखो कामगार या खनिकर्म मुख्यालयाच्या परिक्षेत्रात येतात.
केंद्रात भाजपाचे मोदी सरकार आल्यापासून मुंबई तसेच न्हावाशेवा बंदरातील महत्त्वाचा व्यापार गुजरातमध्ये हलविण्यात आला. आरबीआयचे विविध विभाग गुजरातेत हलविण्यात आले. मुंबईतील हिरे व्यापार गुजरातमध्ये नेला. आता नागपुरातील खनिकर्म मुख्यालय गुजरातमध्ये नेण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे देशात असलेले औद्योगिक आणि व्यापारी महत्त्व कमी करण्यासाठी मोदी सरकार एक एक पाऊल उचलत आहे. नागपूर हे देशाच्या मध्यवर्ती भागी असल्यामुळे तसेच विविध धातूंच्या आणि कोळशांच्या खाणी आजूबाजूच्या प्रदेशात असल्यामुळे केंद्रीय खनिकर्म मुख्यालय 2002 मध्ये कर्नाटकच्या कोलार येथून हलवून नागपूरला आणण्यात आले होते. आता केंद्राच्या कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ सेफ्टी’ विभागाच्या अखत्यारीत हे खनिकर्म मुख्यालय आणण्यात आले आहे. या विभागाचे मुख्यालय अहमदाबादेत असल्यामुळे खनिकर्म मुख्यालयही अहमदाबादेत हलविण्यात येणार आहे.