नरेंद्र मोदी कट्टर दहशतवादी – चंद्राबाबू नायडू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बाहुबली’ चित्रपटात विरोधी भूमिका निभावणाऱ्या भल्लाळदेवशी तुलना केल्याने चिडलेले आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी नरेंद्र मोदींचा दहशतवादी असा उल्लेख केला आहे. चित्तोड येथे बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलं आहे की, ‘नरेंद्र मोदी एक कट्टर दहशतवादी आहेत. ते एक चांगले नागरिक नाहीत. मी माझ्या अल्पसंख्यांक बंधू, भगिणींना सांगू इच्छितो की, जर तुम्ही नरेंद्र मोदींना मत दिलंत तर नव्या समस्या निर्माण होतील. नरेंद्र मोदींनीच तिहेरी तलाक कायदा आणत तुम्हाला जेलमध्ये पाठवण्याची योजना आखली’, असं चंद्राबाबू नायडू यांनी सांगितलं आहे.
यावेळी चंद्राबाबू नायडू यांनी 2002 गुजरात दंगलीचा उल्लेख केला. ‘नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी करणारा मी पहिला होतो. यानंतर अनेक देशांनी त्यांच्यावर बंदी घातली. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी पुन्हा एकदा अल्पसंख्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत’, असा आरोप चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे.
याआधी 1 एप्रिल रोजी नरेंद्र मोदी यांनी वारंवार टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्यावर टीका करत ‘यु-टर्न बाबू’ असल्याचा टोला लगावला होता. टीडीपी लोकांचा डेटा चोरत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. ‘मला सांगण्यात आलं आहे की, टीडीपीने सायबर क्राइमशी संबंधित सेवा मित्र अॅप सुरु केलं आहे. हे अॅप ना सेवा करत आहे, ना मित्र आहे. हे अॅप लोकांचा डेटा चोरत आहे’, असा आरोप नरेंद्र मोदींनी केला होता.
खोटं बोलणे, यु-टर्न घेणे आता टीडीपी सरकारची ओळख झाली आहे असा आरोप नरेंद्र मोदींनी केला होता. ‘दोन वर्षांपूर्वी काय बोलले होते, आणि आता काय बोलत आहेत ते पहा. दुसऱ्यांवर आरोप करणे याच्याव्यतिरिक्त ते काहीच करु शकत नाही. अशा नेतृत्तावर लोक विश्वास ठेऊ शकत नाही’, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं. आंध्र प्रदेशात 11 एप्रिल रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार आहे.