देशात २४ तासांत ९७ हजार ८९४ नव्या रुग्णांची नोंद
नवी दिल्ली – देशात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून गेल्या २४ तासांत ९७ हजार ८९४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या आता ५१ लाखांच्या वर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत ११३२ मृतांची नोंद झाली आहे.
सध्या देशात ५१ लाख १८ हजार २५४ रुग्ण असून यापैकी १० लाख ०९ हजार ९७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, आतापर्यंत ४० लाख २५ हजार ०८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना संक्रमणामुळे देशात आत्तापर्यंत ८३ हजार १९८ जणांनी आपले प्राण गमावले आहेत.
भारतात आता एकदा कोरोनामुक्त झालेले रुग्ण पुन्हा एका करोना संक्रमणाला सामोरे जात असल्याचं समोर येतंय. फरीदाबादमध्ये असे २३ करोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत जे एकदा करोनामुक्त झालेले आहेत. यामध्ये ईएसआयसी कॉलेजचे आरोग्य कर्मचारी आणि इतर लोकांचा समावेश आहे. करोनामुक्त झाल्यानंतर जवळपास महिनाभरात किंवा ७० दिवसांत हे रुग्ण पुन्हा पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २-३ रुग्णांत केवळ २० दिवसांत पुन्हा कोरोना संक्रमण आढळून आलं आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेच्या काळजीत भर पडली आहे.
नुकतेच, नोएडा आणि मुंबईमध्ये करोनातून बरे झालेले काही रुग्ण पुन्हा एकदा करोना संक्रमित असल्याचं आढळून आलं आहे. यामध्ये नोएडाच्या दोन तर मुंबईच्या चार आरोग्यसेवेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दिल्लीतल्या सीएसआयआरच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ जिमोमिक्स अॅन्ड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी’च्या (IGIB) संशोधनात हा खुलासा झालाय.