देशात १००० टन कांदा लवकरच आयात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/onion.jpg)
देशात कांद्याचे भाव ६० ते ८० रुपये किलो असताना खासगी व्यापाऱ्यांनी कांदा आयातीसाठी मागणी नोंदवली आहे. त्यात १००० टन कांदा महिना अखेरीस भारतात येणार असून त्यामुळे कांद्याचे किरकोळ भाव उतरण्यास मदत होणार आहे. सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
कांद्याची किरकोळ खरेदी किंमत आठवडा भरापूर्वी दिल्लीतच किलोला शंभर रुपये होती. पण नंतर सरकारने वेगवेगळ्या मार्गाने हस्तक्षेप करून हा दर खाली आणला, तरी अजूनही दिल्लीत कांद्याचे भाव किलोला साठ रुपये आहेत. ग्राहक कामकाज मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, खासगी व्यापाऱ्यांनी सरकारकडे आयातीची मागणी केली होती. त्यानुसार व्यापाऱ्यांनी आता कांदा आयात केली असून पुढील महिन्यात १००० टन कांदा भारतात येईल. त्यामुळे भाव उतरण्याची शक्यता आहे. डिसेंबर अखेपर्यंत सरकारने कांद्यावरील फवारणी व इतर फायटोसॅनिटरी निर्बंध उठवले असून आयातीत कुठलाही अडथळा येणार नाही. आयातीमुळे देशात कांद्याची उपलब्धता वाढून भाव उतरणार आहेत. सरकारने एमएमटीसीच्या माध्यमातून १ लाख टन कांदा आयात करण्याचे ठरवले असून ४००० टनांसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. कांद्याचे भाव खरिपाचे उत्पादन ३० ते ४० टक्के कमी झाल्याने वाढले आहेत. कांद्याचे चढे दर रोखण्यासाठी निर्यात बंदी, कांदा साठय़ावर मर्यादा अशा अनेक उपाययोजना सरकारने केल्या आहेत.