देशात नव्या ३६ हजार रुग्णांची नोंद
![2,95,041 new positive patients in 24 hours in the country; 2,023 deaths](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/India_Corona.jpg)
नवी दिल्ली – महाराष्ट्रात सोमवारी गेल्या तीन महिन्यांतील सर्वाधिक कमी रुग्णसंख्या आढळून आली होती. त्याचप्रमाणे आता भारतातील एकूण कोरोना रुग्णांची आकडेवारी समोर आली असून गेल्या २४ तासांत ३६ हजार ४६९ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या तीन महिन्यांतील सर्वाधिक कमी वाढ असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या आकडेवारीमुळे दिलासा मिळाला असून कोरोनाविरोधातील लढाई भारत जिंकत आल्याचं म्हटलं जातंय.
१८ जुलै रोजी ३४ हजार ८८४ करोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यानंतर दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली होती. १७ सप्टेंबरपर्यंत देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत होती. त्यानंतर मात्र दररोज कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. ऑक्टोबर महिन्यात दररोज वाढणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५० हजारांपेक्षा कमी झाली आहे. दिलासादायक म्हणजे भारतात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या झपाट्यानं वाढत आहे तर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं घट होत आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (MoHFW) ने दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७९ लाख ४६ हजार ४२९ इतकी आहे. गेल्या २४ तासांत ४८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबळींची संख्या एक लाख १९ हजार ५०२ इतकी झाली आहे.
उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत गेल्या २४ तासांत २७ हजार ८६० ने घट झाली आहे. सध्या देशात सहा लाख २५ हजार ८५७ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. गेल्या २४ तासांत देशात ६३ हजार ८४२ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ७२ लाख १ हजार ७० इतकी झाली आहे.