देशात गेल्या सात दिवसात 62 हजार लोकांना कोरोनाची लागण
नवी दिल्ली | भारतात कोरोना संसर्गाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज कोरोनाबाधितांची संख्या 2,36,657 वर पोहोचली आहे. भारत कोरोनाबाधितांच्या संख्येबाबत जगात सहाव्या स्थानी आला आहे. आतापर्यंत देशात 6,642 लोकांचा बळी कोरोनामुळं गेला आहे. मागील सात दिवसात 62 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान देशात गेल्या चोवीस तासात सर्वाधिक 294 बळी गेले आहेत. तर देशात गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत आत्तापर्यंतची सर्वाधिक 9 हजार 887 रुग्णांची वाढ झाली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 36 हजार 657 वर पोहोचला आहे. यातील 1 लाख 14 हजार 73 जण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 48.20 टक्के इतका आहे. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 1 लाख 15 हजार 942 इतके आहेत. गेल्या 24 तासांत 4 हजार 611 रुग्ण बरे झाले आहेत.
देशभरात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहेत. राज्यात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा 80229 झाला आहे. त्यातील 35156 बरे झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 2849 जण मृत्यूमुखी पडले आहेत. महाराष्ट्रात शुक्रवारी ( 05 जून ) 1475 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 35 हजार 156 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे. शुक्रवारी कोरोनाचे नवीन 2436 नवे रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोना संक्रमितांचा आकडा 80 हजार 229 इतका झाला आहे. पैकी सध्या 42 हजार 215 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.