‘देशपांडे-कुलकर्णींची मुलं शहीद होत नाहीत’, वादग्रस्त वक्तव्यावर राजू शेट्टींनी मागितली माफी
देशासाठी देशपांडे, कुलकर्णींची मुलं शहीद होत नाहीत, शेतकऱ्यांची मुलं शहीद होतात या आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी माफी मागितली आहे. राजू शेट्टी यांच्या वक्तव्यानंतर ब्राह्मण समाजातून संताप व्यक्त करण्यात आला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून हातकणंगले येथे महाआघाडीचे उमेदवार असणारे राजू शेट्टी यांच्यासाठी हेरले येथे प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
राजू शेट्टी यांनी म्हटलं होतं की, ‘देशासाठी हल्ल्यात शेतकऱ्यांची मुलं शहीद होतात. देशपांडे किंवा कुलकर्णी यांची नाही. पण ते इतरांना देशभक्ती शिकवत असतात’. राजू शेट्टींच्या या वक्तव्यानंतर ब्राह्मण समाजातून रोष व्यक्त करण्यात आला होता. राजू शेट्टींविरोधात कोल्हापुरमध्ये पोलीस तक्रारही दाखल करण्यात आली होती. पण अखेर राजू शेट्टी यांनी ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल जाहीर माफी मागितली आहे. शहिदांना न्याय देण्याच्या हेतूने आपण हे वक्तव्य केल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.