दिल्ली हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी व्यक्त केली चिंता…तातडीने लष्कर तैनात करण्याची गृहमंत्रालयाकडे मागणी…
दिल्ली | महाईन्यूज |
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्यावरुन दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी चिंता व्यक्त करत तातडीने लष्कराला तैनात करण्याची मागणी केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. दिल्लीची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून पोलिसांना त्यावर नियंत्रण मिळवता येत नाही. त्यामुळे तातडीने दिल्लीत लष्कराला तैनात करा, अशी मागणी त्यांनी गृहमंत्र्यालयाकडे केली आहे.
अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, ‘मी पूर्ण रात्रभर नागरिकांशी संपर्क करत आहे. दिल्लीची परिस्थीती अत्यंत चिंताजनक आहे. सर्व प्रयत्न करूनही पोलिस परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकले नाहीत. तसंच ते लोकांचा आत्मविश्वास वाढवू शकले नाहीत. लष्कराला तातडीने बोलावून उर्वरित बाधित भागात कर्फ्यू लागू करावा’, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच, यासंदर्भात मी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, दिल्लीमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याचे समर्थन करणारे आणि विरोध करणारे आमने सामने आले आणि हिंसाचाराला सुरुवात झाली. या हिंसाचाराविरोधात आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २५० पेक्षा अधिक जण यामध्ये जखमी झाले आहेत. जखमींमध्ये जळपास ५६ पोलिसांचा समावेश आहे. दरम्यान घटनास्थळी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.