“दिल्ली हिंसाचार प्रकरणात ‘आपचा’ दोषी आढळल्यास त्याला दुप्पट शिक्षा करू”- केजरीवाल
दिल्ली | महाईन्यूज |
‘दिल्ली हिंसाचार प्रकरणात कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.’, असे मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले आहे. तसंच या प्रकरणात जर आम आदमी पक्षाचा एखादा सदस्य दोषी आढळल्यास त्याला दुप्पट शिक्षा करा. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर कोणतेही राजकारण होऊ नये, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
दिल्ली हिंसाचार आणि गुप्तचर विभागाचे अधिकारी अंकित शर्मा यांची हत्या केल्याचा आरोप आपचे नेहरु विहारचे नगरसेवक ताहिर हुसेन आणि त्यांच्या समर्थकांवर करण्यात आला आहे. यावर बोलताना अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, ‘माझ्याकडे पोलिस नाहीत. मात्र असे घडल्यास त्यामध्ये राजकारण होऊ नये. मग ते भाजप, काँग्रेस किंवा आपचे नेते असोत. तो मंत्रिमंडळात आहे याची पर्वा न करता त्याला शिक्षा झाली पाहिजे. त्याला उचलून तुरुंगात टाका. देशासोबत राजकारण करणे थांबवा.’, असे केजरीवाल यांनी सांगितले.
दरम्यान, दिल्ली हिंसाचारा दरम्यान मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना केजरीवाल सरकारने १० लाखांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख, अल्पवयीनचा मृत्यू झाला असेल तर ५ लाख आणि एखाद्याचे घर, दुकान जळून खाक झाले असल्यास त्यांना ५ लाखांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.