दिल्ली हिंसाचार: केंद्र आणि दिल्ली सरकारांची केवळ बघ्याची भूमिका – सोनिया गांधी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Untitled-207.png)
दिल्लीच्या ईशान्य भागात झालेल्या हिंसाचारामध्ये केंद्र आणि दिल्ली या दोन्ही सरकारांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली, असा आरोप पुन्हा एकदा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला. त्याचबरोबर या प्रकरणी जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशीही मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली.
सोनिया गांधींच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दिल्लीमध्ये लवकरात लवकर स्थिती पूर्वपदावर आली पाहिजे. दिल्लीच्या सर्व भागात शांतता असली पाहिजे, अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रपतींना दिले.
राष्ट्रपतींना भेटल्यावर पत्रकारांशी संवाद साधताना सोनिया गांधी म्हणाल्या, हिंसाचार रोखण्यासाठी सक्रीयपणे पावले उचलण्याऐवजी केंद्र सरकार आणि नव्याने निवडून आलेले दिल्लीतील सरकार या दोहोंनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. अनेकांची घरे आणि संसार हिंसाचारात उद्ध्वस्त झाले. दरम्यान दिल्ली हिंसाचाराप्रकरणी केंद्र सरकार काय ठोस पावलं उचलतात हे पाहण महत्त्वाच ठरणार आहे…