दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांवर केलेल्या कारवाईचे गृहमंत्रालयाकडून समर्थन
नवी दिल्ली – कृषी कायद्याविरोधात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर परेड काढण्यात आली होती. मात्र या परेडदरम्यान हिंसाचार झाल्याचे पाहण्यास मिळाले. शेतकरी आंदोलकांकडून लाल किल्यावर झेंडा देखील फडकविण्यात आला होता. या घटनेत शेकडो पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.ट्रॅक्टर परेड दरम्यान, पोलिसांकडून देखील शेतकऱ्यांवर लाठीहल्ला, अश्रुधुराचा मारा केल्याचे व्हिडीओ समोर आले होते. आता केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे समर्थन केले आहे. पोलिसांकडे दुसरा पर्याय नव्हता, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे.
वाचा :-शेतकरी आंदोलनावर चर्चा का नाही? जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाचा सवाल
एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्रालयाने संसदेत सांगितले की, शेतकऱ्यांच्या कृतीमुळे दिल्ली पोलिसांसमोर दुसरा पर्याय नव्हता. त्यांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या, पाण्याचे फवारे मारले व जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी बळाचा वापर केला. शेतकरी सरकारी मालमत्तेचे नुकसान करत होते, त्यावेळी पोलिसांकडे दुसरा पर्याय उरला नव्हता.दरम्यान, हिंसाचाराच्या घटनेनंतर काही शेतकरी संघटनांनी आंदोलनातून माघार घेतली असली तरी अनेक प्रमूख शेतकरी संघटना आंदोलनावर ठाम आहेत. शेतकऱ्यांनी 6 फेब्रुवारीला देशव्यापी ‘चक्का जाम’ची घोषणा देखील केली आहे.