दिल्लीतील सोने तस्करीप्रकरणी आटपाडी तालुक्यात छापासस्त्र; ४३ कोटी रुपयांचे सोने जप्त
सांगली – नवी दिल्लीच्या रेल्वे स्थानकावर सोन्याची तस्करी करताना सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातील आठ जणांना अटक करण्यात आली आहे. सिमा शुल्क विभाग, केंद्रीय जीएसटी विभाग यांनी संयुक्तपणे आटपाडी तालुक्यात छापे टाकले. त्यावेळी संशयितांच्या घरामधून महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी नवी दिल्लीच्या रेल्वे स्थानकावर अटक केलेल्या आठ जणांकडून तब्बल ४३ कोटी रुपयांचे ८३.६ किलो सोने जप्त करण्यात आले.
हे सोने बिस्किटाच्या स्वरुपात होते. डीआरआयने हे सोने जप्त केले. त्यांनतर आटपाडी तालुक्यात छापे टाकण्यात आले. संशयित मणिपूरच्या सीमेवरून तस्करी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच यामागे मुख्य सूत्रधार कोण, याचाही शोध घेतला जात आहे. यातून सोन्याची तस्करी करणारे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सीमाशुल्क विभाग व सांगली केंद्रीय जीएसटी अधिकाऱ्यांनी आटपाडी तालुक्यात संयुक्त छापे टाकले आणि आरोपींच्या घरातून काही कागदपत्रे ताब्यात घेतली. नवी दिल्लीतील रेल्वे स्टेशनवरून महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) म्यानमारहून भारतात तस्करी करणार्या व दिल्ली रेल्वे स्थानकात अटक केलेल्या आठ जणांकडून ४३ कोटी रुपयांचे सोने जप्त केल्याचे सांगितले. सांगली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आरोपींकडून ८३.६ किलो वजनाचे ५०४ सोन्याचे बार जप्त केले आहेत.