… तर मी आत्महत्या करेन, शेतकरी नेत्याचा सरकारला इशारा
नवी दिल्ली – गेली दोन महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहे. प्रजासत्ताक दिनी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीनंतर मात्र चित्र पलटले आहे. दोन शेतकरी संघटनांनी या आंदोलनातून माघार घेतली आहे. मात्र तरीही काही प्रमूख संघटना आंदोलनावर ठाम आहे. आता या आंदोलकांच्या विरोधात देखील स्थानिक लोक रस्त्यावर उतरले आहेत.
याच पार्श्वभूमीवर सरकारने कृषी कायदे मागे घेतले नाहीत तर मी आत्महत्या करेन, असा इशाराच भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केंद्राला दिला आहे.राकेश टिकैत यांच्यावर युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण त्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्यास नकार दिला.
टिकैत म्हणाले की, सरकारने आमची लाईट-पाण्याची सुविधा तोडली आहे. जर गरज पडली तर गावांमधून आणखी लोक येतील. आम्ही गावांतून पाण्याचे टँकर मागवू. जोपर्यंत सरकार चर्चा करत नाही आम्ही याच ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत. तसेच त्यांनी आत्मसमर्पण करण्यास देखील नकार दिला आहे.