चर्चेला पर्याय नाही!: मोदी भेटीनंतर मुफ्तींचा सूर!
नवी दिल्ली: ‘काश्मीरमधील तणाव कमी करायचा असेल तर तशी वातावरणनिर्मिती करायला हवी. दगडफेकीला गोळीनं उत्तर देऊन प्रश्न सुटणार नाही. चर्चेतूनच यावर तोडगा काढला जाऊ शकतो. सध्यातरी त्याला पर्याय नाही,’ असं आग्रही मत जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी आज मांडलं.
जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेला हिंसाचार व भाजप-पीडीपी आघाडीमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मेहबुबा मुफ्ती यांनी राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सुमारे अर्ध्या तासाच्या या बैठकीत काश्मीरमधील दगडफेकीच्या घटनांसह अन्य अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. खुद्द मेहबुबा यांनीच पत्रकारांना चर्चेची माहिती दिली. ‘काश्मीरबाबत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं धोरण राबवण्याची ग्वाही मोदी यांनी अनेकदा दिली आहे. वाजपेयींनी नेहमीच चर्चा व समन्वयावर भर दिला होता. त्यांनी कधीही संघर्षाची भूमिका घेतली नव्हती. त्यांच्या कार्यकाळात हुर्रियतसह अन्य गटांशीही चर्चा झाली होती,’ याची आठवण मेहबुबा यांनी दिली. काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याच्या प्रश्नावर त्यांनी केंद्र सरकारकडं बोट दाखवलं. ‘राष्ट्रपती राजवटीचा निर्णय केंद्र सरकारनं घ्यायचा आहे,’ असं त्या म्हणाल्या.