नाशिक पोलीस आयुक्तपद सोडताना विश्वास नांगरे पाटील यांचा जनतेशी भावूक संवाद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/whatsapp-image.jpeg)
नाशिक: नाशिकचे मावळते पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील पदमुक्त होऊन मुंबईकडे रवाना झाले आहेत. पदभार सोडताना नाशिकच्या जनतेसाठी ऑडिओ मेसेजच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गेली दीड वर्ष नाशिकची सेवा करण्याची संधी मिळाली, याबद्दल जनतेचे आभार व्यक्त करताना नांगरे पाटील काहीसे भावूक झाले आहेत.
काय आहे ऑडिओ मेसेज? पहा सविस्तर…
“नाशिककर नमस्कार, गेली दीड वर्ष आपली सेवा करण्याची संधी मला मिळाली. आज मी पोलीस आयुक्तपदाचा चार्ज दीपक पांडे यांच्याकडे देऊन मुंबईला सहआयुक्त म्हणून पदभार स्वीकारण्यासाठी रवाना होत आहे. गेली दीड वर्ष या प्रगत, सुधारणावादी शहराची सेवा करण्याची संधी मिळाली होती. या शहराला पौराणिक, ऐतिहासिक असा ठेवा आहे. शिक्षण, शेती, उद्योग, पर्यटन अशा सगळ्या क्षेत्रात नाशिकची घोडदौड मोठ्या वेगाने सुरु आहे. इथे काम करताना इथली माती, इथली माणसं, इथलं पाणी, इथला निसर्ग यांच्या प्रेमात माणूस पडतो. या आल्हाददायक, गोड शहराला सोडून जाताना निश्चित अंतःकरण जड आहे. पण हा ऋणानुबंध कायम राहील. आपल्या संपर्कात राहीन, आपले आशीर्वाद, प्रेम माझ्या पाठीशी राहील, अशी अपेक्षा करतो. कोव्हिड संक्रमण काळ असो, निवडणुका किंवा सण-उत्सव, नाशिककर माझ्या पाठीशी कायम उभे राहिले होता. नाशिकची जनताच प्रगल्भ आहे, कायद्याचे पालन करणारी आहे. नाशिकरांच्या प्रगतीसाठी, सुरक्षिततेसाठी, आरोग्यासाठी सदैव सुयश चिंतितो. जय हिंद!” -विश्वास नांगरे पाटील