गड-किल्लेच छत्रपती शिवरायांचे खरे स्मारक : प्रा. शंकर चव्हाण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/IMG-20201125-WA0030.jpg)
- सागाव येथे किल्ला स्पर्धेचे बक्षीस वितरण
शिराळा / विनायक नायकवडी :
अभेद्य असणारे गड-किल्लेच छत्रपती शिवरायांचे खरे स्मारक असून त्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी शिवप्रेमींनी पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक प्रा.शंकर चव्हाण यांनी केले.
सागाव (ता. शिराळा) येथील संयुक्त शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने आयोजित किल्ला स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गुलाबराव देशमुख होते.
प्रा. चव्हाण म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा प्रेरणादायी असणारा इतिहास काही मंडळीकडून चुकीच्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासाठी शिवप्रेमींनी चिकित्सकपणे इतिहास अभ्यासण्याची गरज निर्माण झाली आहे.
किल्ला स्पर्धेत विराज, वरद, ओम, शिवराज दिवे यांनी प्रथम, रुपेश ओंडकर याने द्वितीय, प्रतीक लोहार याने तिसरा, सिद्धेश गायकवाड याने चौथ्या तर पार्थ पाटील याने पाचवा क्रमांक मिळवला.
यावेळी प्रा. ऋषीराज जाधव, प्रा. इंद्रजीत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.बाजीराव ताटे, पंकज पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत विराज पवार यांनी,प्रास्ताविक अभिजित पाटील यांनी सुत्रसंचालन विवेक फातले यांनी तर आभार विजय संकपाळ यांनी मानले.