कोरोना काळात नोकरी गमावलेल्या कामगारांना दिलासा, तीन महिने अर्धा पगार मिळणार
नवी दिल्ली | कोरोनाच्या संकटकाळात नोकरी गमावलेल्या लाखो कामगारांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. या कामगारांना तीन महिने पगाराच्या 50 टक्के रक्कम बेरोजगारी भत्ता किंवा ‘अनएम्पलॉयमेंट बेनिफिट’च्या स्वरुपात दिली जाणार आहे.
बेरोजगार भत्त्यासाठी केंद्राकडून पात्रता निकष शिथील करण्यात आले आहेत. केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) बोर्डाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.
24 मार्च ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत नोकरी गमावलेल्या/गमावणाऱ्या सुमारे 41 लाख लाभार्थ्यांना याचा फायदा होईल, असा अंदाज ईएसआयसीने व्यक्त केला आहे. ही सुविधा कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे सदस्य असणाऱ्या कामगारांना मिळणार आहे.
“या निर्णयामुळे ईएसआयसी अंतर्गत पात्र विमाधारकांना शेवटच्या तीन महिन्यांच्या पगाराच्या सरासरीच्या 50 टक्के रोख रक्कम तीन महिन्यांपर्यंत मिळेल” असे ईएसआयसीच्या मंडळाच्या सदस्य अमरजीत कौर यांनी सांगितल्याचे वृत्त ‘क्विंट’ वृत्तपत्राने दिले आहे.