कोरोनाची लस देताना सामान्य-व्हीआयपी असा भेदभाव करु नका – केजरीवाल
![Corona patient numbers rise in Delhi, strict lockdown from today to next Monday; Kejriwal's announcement](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/arvind-kejriwal.jpg)
नवी दिल्ली – हिवाळा सुरू होताच दिल्लीत कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. अशातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोनाची लस देताना सामान्य आणि व्हीआयपी असा भेदभाव केला जाऊ नये, असे मत व्यक्त केले आहे. केजरीवाल म्हणाले, ‘सर्वांचाच जीव महत्त्वाचा आहे, त्यामुळे कोरोनाची लस देताना सामान्य आणि व्हीआयपी असा भेदभाव केला जाऊ नये. कोरोनाची लस देताना कोरोना योद्ध्यांना प्राधान्य द्यायला हवे. त्यांच्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि शारीरिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना प्राधान्य द्यायला हवे.’
त्याचबरोबर ‘कोरोनावरील लसीचे वितरण करण्यासाठी केंद्र सरकारकडून योजना तयार केली जाण्याची शक्यता आहे. दिल्ली सरकार मात्र राजकीय विचार न करता तांत्रिकदृष्ट्या आणि प्राथमिकतेच्या आधारावर कोरोनावरील लसीचे वितरण करण्यास प्राधान्य देईल’, असेही केजरीवाल यांनी सांगितले आहे.
दरम्यान, दिल्लीतील नागरिकांचा निष्काळजीपणा आणि सरकारचा हलगर्जीपणा कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्यास कारणीभूत असल्याचे एका सर्वेक्षणातून आढळून आले आहे. सणांमध्ये वाढलेली नागरिकांची गर्दी, मेट्रो आणि बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा घाईने घेतलेला निर्णय, लॉकडाऊनमध्ये दिलेली सवलत, कोविड सेंटरची कमतरता आणि मोहिमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आलेले अपयश या पाच कारणांमुळे दिल्लीतील कोरोना नियंत्रणाचा कार्यक्रम फसल्याचे या अहवालातून पुढे आले आहे.